ञ्यंबकेश्वर : माझे कुटुंब, माझी जबाबदारी हा उपक्रम फक्त कोरोना नियंत्रनासाठीच नसून कुपोषण निर्मूलन यासाठीही महत्वपूर्ण असुन कुपोषित बालकांची योग्य ती काळजी, जबाबदारी कुटुंबातील व्यक्तींनी घेतली तर कुपोषण निर्मुलन दूर नाही, एक मुठ पोषणाची हा उपक्रम जबाबदारीने राबवण्यासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांची जबाबदारी विशेष आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि आरोग्य विभाग यांनी समन्वयाने काम केल्यास कुपोषण कमी होणारच, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती तसेच एकात्मिक बालविकास सेवायोजना स्थापना दिना प्रसंगी खंबाळे येथे आयोजित कार्यक्रमा प्रसंगी केले.यावेळी शुभम गुप्ता (भा.प्र. से.) उपायुक्त आयकर मेघा भार्गव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास दीपक चाटे, सरपंच रामदास गायकवाड, उपसरपंच चंद्रकला मोरे, रामकृष्ण आरोग्य मिशनचे श्रीकंठानंद स्वामी, भाऊसाहेब मोरे, विस्तार अधिकारी दगडु राठौड, बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल डिघुळे, पर्यवेक्षिका वीणा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी समर्पण सेवाभावी संस्था व श्री रामकृष्ण आरोग्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खंबाळे येथे कमी वजनाच्या बालकांना नागली सत्व तसेच गरोदर मातांना Micro Nutrients चे वाटप करण्यात आले. तसेच एक मुठ पोषणाची उपक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत निधीतून कुपोषित बालकास आवश्यक जीवनसत्वांची अन्नधान्याचे किट देऊन योजनेचे उदघाटन करण्यात आले.यावेळी अंगणवाडी सेविकांनी शेवग्यापासून बनवलेल्या विविध पाककृती व आहार प्रदर्शनास मान्यवरांनी भेट देत त्याबाबत कौतुक केले.
प्रास्ताविक करताना बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल डिघुळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सोबत प्रकल्पात सुरू असलेल्या कार्यक्रमाची माहीती दिली. समर्पण संस्थेच्या रूपा भार्गव यांनी पोषणाची जबाबदारी ही सामाजिक जबाबदारी असून संस्थेचे योगदान याकामासाठी नियमित मिळत राहील याबाबत ग्वाही दिली.रामकृष्ण आरोग्य मिशनचे श्री श्रीकंठानंद स्वामी यांनी खेडे हे स्वयंपूर्ण असून आपण ग्रामीण भागात राहून कशा पद्धतीने नैसर्गिक गोष्टींचा वापर पोषणासाठी करू शकतो याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी कुपोषित बालकांना नागली सत्व, गरोदर मातांना Micro Nutrients व किशोरी मुलींना सॅनिटरी नॅपकिन वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. पर्यवेक्षिका व्ही. डी. कुलकर्णी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.