पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्युची घोषणा केली असल्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेनी आपला नियमित मेगा ब्लॉक रद्द केला आहे. जनता कर्फ्युदरम्यान नागरिक बाहेर निघणार नसल्याने रेल्वे प्रशासनाने १ हजार १५१ लोकल फेर्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र डॉक्टर, नर्सेस, महापालिका कर्मचारी, बेस्ट कर्मचारी यांच्यासारख्या अत्यावश्यक सुविधांसाठी काही लोकल चालवण्यात येणार आहे. त्यामुळे या सेवा कमी करण्यात आल्या आहे.
लोकलचे प्रवासी झाले कमी
करोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वे प्रवासात गर्दी न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. या आवाहनाचे पालन नागरिक करत असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे प्रवासातील प्रवासी दिवसेंदिवस कमी होत आहेत. तसेच शुक्रवारी राज्य सरकारनेही ३१ मार्चपर्यंत मुंबई महानगर क्षेत्र, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर येथील सर्व दुकाने, आस्थापना आणि खासगी कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे देखील आता लोकलचे प्रवासी कमी झाले आहेत.
मध्य रेल्वेवर ६०% फेऱ्या सुरू
डॉक्टर, नर्सेस, महापालिका कर्मचारी, बेस्ट कर्मचारी यांच्या आवश्यक सुविधेसाठी लोकल सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे जनता कर्फ्युदरम्यान आपत्कालीन सुविधेसाठी लोकल सेवा सुरुच राहणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर एकूण फेर्यांपैकी ६०% फेर्या चालवण्यात येणार आहेत. फक्त १७३२ पैकी ६७४ लोकल फेर्या रद्द करण्यात येणार आहेत. तर पश्चिम रेल्वेवर १३१३ पैकी ४७७ लोकल फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत.