राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील ८३ टक्के कोरोना रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नसल्याची माहिती आज बुधवारी दिली आहे. “मुंबईत बेड उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे. मुंबईतील ८३ टक्के लोकांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. त्यामुळे लक्षणं नसलेल्या अशा कोरोनाच्या रुग्णांना त्यांच्या घरीसुद्धा क्वारंटाईन करता येऊ शकतं, असं आयसीएमआरने सांगितलं आहे. त्यामुळे त्यांना जर कडक पद्धतीने क्वारंटाईन केलं तरी चालेल असं आयुक्तांनीही सांगितलं आहे. जेणेकरुन आपल्याला बेड उपलब्ध होतील,” असं राजेश टोपे म्हणाले.
पुढे म्हणाले की, “मुंबईत डबलिंगचा रेट जो सात वरुन १० झाला आहे. देशाच्या सरासरीपेक्षा मुंबईत सुधारणा झाली असून मृत्यू दर जो पाच होता तो आता साडे तीनपर्यंत आला आहे. मुंबईत मत्यू दरही कमी होत आहे. कितीही मोठी वाढ झाली तरी त्यादृष्टीने आपण तयारी केली आहे.”
हेही वाचा – दिलासादायक: मुंबईत कोरोना रुग्णावर केलेली प्लाझ्मा थेरपी यशस्वी – राजेश टोपे
तथापि, मुंबईत पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. “लिलावती रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेली होती. या थेरपीला यश मिळालेलं आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मला ही थेरपी यशस्वी झाली असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, आता नायर रुग्णालयात दुसरी थेरपी केली जाणार आहे. नायर रुग्णालयातील डॉक्टरांनीही आपल्याला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पण ही थेरपी करताना योग्य मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. त्यांचं पालन केलं तरच थेरपी यशस्वी होत असल्याचं मला सांगण्यात आलं आहे. पुण्यातही हा प्रयोग करणं शक्य आहे,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.