मराठी साहित्य विश्वातील ज्येष्ठ कवी, संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचं शुक्रवारी ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ७८ वर्षाचे होते. पेण येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काळसेकर यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.सतीश काळसेकर मराठी साहित्य विश्वातील प्रसिद्ध कवी, संपादक, अनुवादक म्हणून ओळखले जातात. याचबरोबर लघुनियतकालिकांच्या चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते आणि मार्क्सवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे.
सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील काळसे गावात सतीश काळसेकर यांचे बालपण गेले. सिंधुदुर्गात राहूनचं त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. मात्र महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मुंबईत पूर्ण केले. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी मासिक ज्ञानदूत आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. याचदरम्यान काळसेकर यांनी काव्य लेखनापासून आपल्या वाङ्मयीन कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीला महाविद्यालयाच्या नियतकालिकातून, नवाकाळ, मराठा यासारख्या वर्तमानपत्रातूनही त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर विविध वाङ्मयीन नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. १९७१ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह इंद्रियोपनिषद् प्रकाशित झाला. या कविता संग्रहापासूनच कवी म्हणून त्यांना विशेष ओळख मिळू लागली. त्यानंतर साहित्य विश्वातील अनेक क्षेत्रात त्यांनी काम केले. कविता, अनुवादन, गद्य असे वेगवेगळे साहित्य त्यांनी हाताळले. याचदरम्यान ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ या त्यांच्या पुस्तकाला २०१४ सालच्या ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
प्रसिद्ध कवी सतीश काळसेकर यांचे इंद्रियोपनिषद् (१९७१), साक्षात (१९८२), विलंबित (१९९७) हे कवितासंग्रह आत्तापर्यंत प्रकाशित करण्यात आले आहेत. तसेच त्यांनी अनेक कवितासंग्रहांचे मराठी अनुवादही केले. सतीश काळसेकर यांच्या कवितांचा समावेश अनेक महत्त्वाच्या संकलनात झाला आहे. या कवितांचे हिंदी, बंगाली, मल्याळम, इंग्रजी, पंजाबी यासह अन्य भारतीय भाषांत अनुवाद झाले आहे. काळसेकर यांनी आत्तापर्यंत मी भयंकराच्या दारात उभा आहे (नामदेव ढसाळ यांची कविता, संपादन – प्रज्ञा दया पवारसह, २००७), आयदान: सांस्कृतिक ठेवा (संपादन- सिसिलिया कार्व्हालोसह, २००७), निवडक अबकडइ (संपादन- अरुण शेवतेसह, २०१२) यांचे संपादन केले आहे. तर वाचणार्याची रोजनिशी (२०१०), पायपीट (२०१५) हे त्यांचे प्रसिद्ध गद्यलेखन आहे.
India Corona Update: देशातील नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, एका दिवसात ५४६ कोरोनाबळी