घरताज्या घडामोडीशिवसेना लोकप्रतिनिधींना आवरा...! अन्यथा महामार्गाची कामे बंद पडतील

शिवसेना लोकप्रतिनिधींना आवरा…! अन्यथा महामार्गाची कामे बंद पडतील

Subscribe

लोकप्रतिनिधीची दहशत अशीच सुरू राहिली तर महाराष्ट्रातली राष्ट्रीय महामार्गावरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला विचार करावा लागेल, असा थेट इशारा गडकरी यांनी पत्रातून दिला आहे.

शिवसेना लोकप्रतिनिधींना आवरा…! अन्यथा महामार्गाची कामे बंद पडतील, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी स्फोटक पत्र लिहिले आहे. शिवसेना आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी अधिकारी आणि कंत्राटदारांना भंडावून सोडलं आहे. काही कामेदेखील या लोकप्रतिनिधींनी बंद पाडली आहेत. लोकप्रतिनिधीची दहशत अशीच सुरू राहिली तर महाराष्ट्रातली राष्ट्रीय महामार्गावरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला विचार करावा लागेल, असा थेट इशारा गडकरी यांनी पत्रातून दिला आहे.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गावरील प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी बरेच प्रकल्प पूर्णत्वास आलेले असून काही प्रगतीपथावर आहेत. मात्र, अनेक प्रकल्पांच्या कामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचे माझ्या निदर्शनास आलेले आहे. विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना भंडावून सोडणे व त्यांनी न ऐकल्यास कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत या लोकप्रतिनिधींची मजल गेली आहे. विशेषत: वाशिम जिल्ह्यात हे प्रामुख्याने घडते आहे. अकोला व नांदेड २०२ किमी राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये चौपदरीकरणाची काणे चार पॅकेजेसमध्ये सुरू आहेत. गेडशी ते वाशिम या पॅकेज -२ मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (लांबी १२ किमी) निर्माण करण्याचे काम सुद्धा समाविष्ट आहे. परंतु, प्रस्तुत बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकलप्रतिनिधींनी थांबवले असल्याचे मला सांगण्यात आले आहे, असे गडकरी यांनी पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

या मतदारसंघात सुरू असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीमध्ये काम अंतिम करण्याबाबत विनंती केली आहे. पुलगाव-कारंजा-मालेगाव-महेकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे किंमत १३५ कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे, असे गडकरी यांनी नमूद केले आहे.

वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणार्‍या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होते. अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मशिनरीची जाळपोळ करून कंत्राटदाराचे अधिकारी कर्मचारी कामगार यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे. हे असंच चालत राहिलं तर महाराष्ट्रातली राष्ट्रीय महामार्गावरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल. यामुळे महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल, याकडे गडकरी यांनी पत्रातून लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ दखल
नितीन गडकरी यांच्या पत्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ दखल घेत थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश दिले आहेत. यात त्यांनी कंत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींविरुद्ध केलेल्या तक्रार अर्जाची आणि त्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यांची माहिती मागितली आहे. यामुळे ठेकेदार आणि अधिकार्‍यांना धमक्या देत महामार्गांची कामं बंद पाडणार्‍यांविरोधात कारवाई सुरू होईल, असे दिसत आहे. ‘आपल्याकडे कंत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींविरुद्ध केलेल्या तक्रार अर्ज आणि त्या अनुषंगाने गुन्हे दाखल झाले आहेत का? तसेच याबाबत झालेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास तात्काळ उपलब्ध करून द्यावा,’ असे पोलीस महासंचालकांना मुख्यमंत्र्यांकडून पाठवलेल्या आदेश पत्रात म्हटले आहे.


हेही वाचा – शिवाजी महाराजांचा अख्ख्या देशावर प्रभाव, बाबासाहेब पुरंदरेंना पंतप्रधान मोदींकडून मराठीत शुभेच्छा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -