घरमहाराष्ट्रCM Uddhav Thackeray Discharge: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना २२ दिवसानंतर डिस्चार्ज

CM Uddhav Thackeray Discharge: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना २२ दिवसानंतर डिस्चार्ज

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (CM Uddhav Thackeray Discharge) उद्धव ठाकरे यांना मानेचा आणि मणक्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना १० नोव्हेंबरला दक्षिण मुंबईतील एचआर रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी मणक्यावरील शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, २२ दिवसानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांना राज्याचे पर्यावरण मंत्री आणि त्याचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी स्वत: गाडी चालवत घरी घेऊन गेले.

सकाळी केल्या जाणाऱ्या चाचणीच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह ते वर्षा या शासकीय निवासस्थानी रवाना झाले. उद्धव ठाकरे यांना डॉक्टरांनी लांब पल्ल्याचा प्रवास करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे मातोश्रीवर न जाता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा या निवासस्थानी राहणार आहेत.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंवर डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी शस्त्रक्रिया केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी १२ नोव्हेंबर रोजी दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाण्याच्या चर्चा होत्या. मात्र, २२ दिवसानंंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावेळी म्हणाले होते की, गेली सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हटलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. आरोग्याविषयी माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -