वनविभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र वनविभागात मेगा भरती करण्याचा निर्णय घेण्यात शासनाकडून घेण्यात आला आहे. यासाठीच्या अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरूवात करण्यात येणार आहे. राज्यातील तब्बल 2 हजार 417 पदांसाठी वन विभागात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 30 जूनपर्यंत क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना आपला अर्ज भरता येणार आहे. वन कर्मचाऱ्यांवरील कामाचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा – western highway : एटीएम, स्तनपान केंद्र, मोबाईल चार्जिंग; दहिसरला होणार सर्व सोयीसुविधांचे प्रसाधनगृह
इच्छुक उमेदवार www.mahaforest.gov.in या अधिकृत संकेत स्थळावरून आपला अर्ज भरू शकतात. वनविभागाची भरती प्रक्रिया राज्यस्तरीय आणि प्रादेशिक पदानुसार राबविण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पदांमध्ये लघुलेखक (उच्च व निम्न श्रेणी), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), वरिष्ठ सांख्यिकी सहायक, कनिष्ठ सांख्यिकी सहायक यांचा, तर प्रादेशिक पदांमध्ये लेखापाल, सर्वेक्षक, वनरक्षक यांचा समावेश असणार आहे. वनसंपदेच्या संरक्षणाची धुरा असणारे वनरक्षकांचे सर्वाधिक 2 हजार 138 पदांवर भरती केली जाणार आहे. त्यामुळे लवकरच वनपरिक्षेत्रांना हक्काच्या वनरक्षकांसह अधिकारी मिळणार आहे.
लेखापाल, वरिष्ठ व कनिष्ठ सांख्यिकी, कनिष्ठ अभियंता या पदासाठी 200 गुणांची ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लघुलेखक आणि सर्वेक्षक या पदांसाठी 120 गुणांची लेखी परीक्षा होणार असून, 45 टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना 80 गुणांची व्यावसायिक चाचणी द्यावी लागणार आहे. तर वनरक्षक पदासाठी 120 गुणांची लेखी परीक्षा होणार असून 80 गुणांसाठी धाव चाचणी घेण्यात येणार आहे. त्यात पुरुष उमेदवारांना 5 तर महिला उमेदवारांना 3 किलोमीटरचे अंतर निर्धारित वेळेत पार करावे लागणार आहे.
लघुलेखक (उच्च) पदासाठी 13 जागा, लघुलेखक (निम्न) पदासाठी 23 जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी 08 जागा, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक पदासाठी 05 जागा, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक पदासाठी 15 जागा, लेखापाल पदासाठी 129 जागा, सर्वेक्षक पदासाठी 86 जागा आणि वनरक्षक पदासाठी सर्वाधिक अशा 2 हजार 138 जागांवर भरती करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील उच्चशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात आहे. तर या भरतीमुळे वन कर्मचाऱ्यांवरील कामाचा अतिरिक्त भार कमी होणार आहे.