दिल्लीच्या निवडणुका नजीक येऊ लागल्या असल्याने राजकीय पक्षांकडून आश्वासनांची खैरात सुरू झाली आहे. अरविंद केजरीवाल सरकारकडून दिल्लीवासीयांना फक्त 200 युनिटपर्यंत वीज मोफत मिळत आहे. मात्र, दिल्लीत आमचे सरकार आल्यानंतर 600 युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात येईल. तसेच, छोट्या उद्योगांना 200 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल, असे आश्वासन दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षात दिल्लीत केलेल्या विकास कामांचा पाढा वाचण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीवासीयांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काम आम आदमी पार्टीच्या सरकारने केल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ते आतापर्यंत जेवढी विकास कामे झाली नाही. तेवढी विकास कामे गेल्या पाच वर्षात दिल्लीत आम आदमी पार्टीच्या सरकारने केली आहेत, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. दुसरीकडे, दिल्लीतील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल सरकावर भाजपाने केला आहे.
केजरीवाल सरकारने 509 शाळा आणि 20 नवीन महाविद्यालये सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, असे काहीच केले नाही. याशिवाय, दिल्लीतील रुग्णालयांमध्ये आयसीयू, बेड आणि व्हेंटिलेटर यांसारख्या आवश्यक सुविधा सुद्धा नाही. एवढेच नाही तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वत: जलबोर्डाचे चेअरमन आहेत. तरी सुद्धा दिल्लीतील जनतेला दूषित पाणी प्यावे लागले, असे भाजपाचे दिल्लीतील अध्यक्ष मनोज तिवारी यांनी म्हटले आहे.