दिल्लीमधील तीन महानगरपालिकांचे एकीकरण केले जाणार आहे. त्यासंदर्भात दिल्ली महानगरपालिका (दुरुस्ती) विधेयक आणण्यात आलं आहे. या विधेयकावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत उत्तर देताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जे प्रश्न उपस्थित केले होत, त्या प्रश्नांना उत्तर दिलं. अमित शाह म्हणाले की मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे विधेयक संविधानानुसार आहे आणि ते पूर्णपणे घटनात्मक विधेयक आहे. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश असल्याने त्यासंबंधी कोणताही कायदा आणण्याचा अधिकार भारत सरकारला आहे. लोकसभेने दिल्ली महानगरपालिका (दुरुस्ती) विधेयक, २०२२ मंजूर केले. या विधेयकात दिल्लीतील तीन महानगरपालिकांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.
राज्यांच्या अधिकारांबाबत चर्चा सुरू असल्याचे अमित शहा म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालही या अधिकारांबाबत बोलतात. मी महाराष्ट्र, गुजरात किंवा बंगालसाठी असे विधेयक आणू शकत नाही. मी किंवा केंद्र राज्यांमध्ये हे करू शकत नाही. पण जर तुम्हाला राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यातील फरक माहित नसेल तर मला वाटते राज्यघटनेचा पुन्हा अभ्यास करणे आवश्यक आहे, असा टोला शहा यांनी केजरीवाल यांना लगावला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत दिल्ली महानगरपालिका (दुरुस्ती) विधेयक, २०२२ वरील चर्चेला उत्तर देताना सांगितले की, हे विधेयक संविधानाच्या अनुच्छेद 239AA नुसार संसदेच्या अधिकारांमध्ये आहे.
This Bill is within the powers vested into the Parliament as per Section 239 AA of the Constitution: Union Home Minister Amit Shah replies to the discussion on The Delhi Municipal Corporation (Amendment) Bill, 2022 in Lok Sabha pic.twitter.com/z6hzax5KRk
— ANI (@ANI) March 30, 2022
बंगालमधील हिंसाचारावरही केंद्रीय गृहमंत्र्यांचं भाष्य
बंगालमधील हिंसाचारावर अमित शहा म्हणाले की, विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारून आम्हाला सत्तेवर यायचे नाही. हत्यांच्या मालिकेतून आम्हाला ते नको आहे. मजुरांच्या पत्नी तसेच बहिणींवर बलात्कार होऊ नयेत, अशी आमची इच्छा आहे. ही आपली संस्कृती नाही, असं शहा म्हणाले.
ज्यांना सत्ता गमावण्याची भीती वाटते तेच त्यावर आक्षेप घेऊ शकतात. लोकशाहीचे पुरस्कर्ते कधीच विरोध करू शकत नाहीत. आमचा कार्यक्रम, विचारधारा, आमच्या नेत्यांची लोकप्रियता आणि आमची कामगिरी याच्या जोरावर आम्हाला निवडणूक लढवायची आहे आणि जिंकायची आहे, असे शहा म्हणाले.
प्रत्येक पक्षाने आपली विचारधारा, भूमिका, कार्यक्रम आणि कामगिरी घेऊन सर्वत्र जायला हवे. हेच लोकशाहीचे सौंदर्य आहे. इथे आक्षेपार्ह काय आहे? आपल्या विचारधारेवर आणि लोकप्रियतेच्या जोरावर आपले उमेदवार निवडून यावेत, असे एखाद्या पक्षाला वाटत असेल, तर त्यात आक्षेपार्ह ते काय? असा सवाल देखील अमित शहा यांनी केला.