अनेक दिवसांपासून रेल्वे तिकिटांमध्ये मिळणाऱ्या सवलतींबाबत ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं होतं. रेल्वे तिकीटांमध्ये सवलतीबाबतचा सवाल त्यांना गोंधळात टाकत होता. मात्र, याबाबत आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत स्पष्ट उत्तर देत सरकारची भुमिका स्पष्ट केली आहे. सध्या ज्येष्ठ नागरिकांना तिकीटांमध्ये सवलत देण्याची सरकारची कोणतीही योजना नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवास विनासवलत करावा लागणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटांत ५० ते ५५ टक्के सवलत मिळत होती. मात्र ही सवलत मागील २ वर्षांपासून म्हणजे मार्च २०२०पासून बंद आहे. त्यामुळं ज्येष्ठ नागरीकांना रेल्वे प्रवासादरम्यान तिकीटांचे बुकिंग विनासवलत बुक करावे लागत होते. देशभरात आलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर केंद्र सराकरानं लॉकडाऊनची घोषणा केली होती. या लॉकडाऊनमुळं रेल्वे प्रशासनानं मार्च २०२०मध्ये ही सुविधा पुढे ढकलली होती.
दरम्यान, कोरोनाचा प्रदुर्भाव कमी झाला असून, कोरोनानंतर मागील २ वर्षांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे प्रवासात वाढ झाल्याचं समजतं. याबाबत रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मार्च २०२० ते ३१ मार्च २०२१ दरम्यान १.८७ कोटी ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वेने प्रवास केला, तर १ एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान ४.७४ कोटी ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला आहे.
आदर्श स्थानक योजनेअंतर्गत १,२५३ रेल्वे स्थानकांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. तसचं, त्यापैकी १२१३ स्थानकांचा आतापर्यंत विकास करण्यात आला आहे. उर्वरित ४० स्थानके २०२२-२३ या आर्थिक वर्षात विकसित करण्याचं नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. खासदार विष्णू दयाल राम यांच्या प्रश्नाला रेल्वेमंत्र्यांनी लेखी उत्तरात हे उत्तर दिले.