काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षांनी भाजपवर फुट पाडणे आणि ध्रुवीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी विरोधी पक्षाकडून केंद्र सरकारला टार्गेट केलं जात आहे. विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात सरकारी यंत्रणा वापरल्या जात असल्याचं सोनिया गांधी यांनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत म्हटलं आहे.
धमक्या आणि अशा पद्धतींमुळे विरोधक घाबरणार नाहीत किंवा गप्प बसणार नाहीत. द्वेष पसरवणाऱ्या शक्तींविरोधात आपल्याला उभे राहायचे आहे, असे सोनिया गांधी बैठकीत म्हणाल्या. यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या की, मध्यम आणि लघु उद्योगांची स्थिती अजूनही वाईट आहे, तर शेतकऱ्यांना जे आश्वासन दिले होते ते पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. स्वयंपाकाचा गॅस, स्वयंपाकाचे तेल, पेट्रोल-डिझेल, खते आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सहनशीलतेच्या मर्यादेपलीकडे गेल्या आहेत आणि सातत्याने वाढत आहेत.
यूपीए सरकारने सुरू केलेल्या मनरेगा आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षेचे कौतुक करताना म्हणाल्या की, पंतप्रधानांकडून ज्या योजना आखण्यात आल्या होत्या. त्या योजना दोन वर्षांपासून कोट्यवधी लोकांसाठी तारणहार ठरल्या आहेत.
रशिया-युक्रेन युद्धामुळे तेथून बाहेर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर सोनिया गांधी म्हणाल्या की, या हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य सुनिश्चित केले पाहिजे. भारतातील वैद्यकीय शिक्षणावरील सातत्याने वाढणाऱ्या खर्चाकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे काँग्रेस अध्यक्षांनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितले.
हेही वाचा : संजय राऊतांचे अलिबागमधील 8 भूखंड, दादरमधील फ्लॅट जप्त, ईडीची मोठी कारवाई