छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले. तर दूरदर्शन वृत्तवाहिनीच्या एका कॅमेरामन अच्युतानंद साहू यांचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नक्षलवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला होता. निवडणुकांच्या तोंडावर सीआरपीएफ जवान सर्च ऑपरेशसाठी निघाले होते. त्यांच्यासोबत दूरदर्शन वृत्तवाहिनीची तीन जणांची टीम देखील होती. दरम्यान जंगलामध्ये लपून बसलेल्या १०० पेक्षा अधिक नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान आणि कॅमेरामनचा मृत्यू झाला. तर या गोळीबारा दरम्यान असिस्टंट कॅमेरामन मोर मुकुट शर्मा सुदैवाने बचावला.
As the Police and Doordarshan team came under attack from Naxals, DD assistant cameraman recorded a message for his mother. pic.twitter.com/DwpjsT3klt
— Rahul Pandita (@rahulpandita) October 31, 2018
अशी घडली घटना
नक्षलवाद्यांच्या गोळीबारा दरम्यान असिस्टंट कॅमेरामन मोर मुकुट शर्मा अडकले. त्यावेळी मोर मुकुट शर्मा जमीनीर झोपले. हल्ला सुरु होता तेव्हा कदाचित आपलाही मृत्यू होईल अशी शक्यता वाटत असल्याने त्यांनी आपल्या आईसाठी एक व्हिडिओ मेसेज रेकॉर्ड करुन ठेवला होता. त्यामध्ये त्यांनी असं सांगितले आहे की, ‘एका रस्त्याने जात होतो. सीआरपीएफचे जवान आमच्यासोबत होते. अचानक नक्षलवाद्यांनी आम्हाला घेरलं. आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कदाचित या हल्ल्यात मी मारला जाईन. परिस्थिती चांगली नाहीये. का माहित नाही पण मृत्यू समोर दिसूनही भीती वाटत नाहीये. वाचणं कठीण आहे. सहा ते सात जवान सोबत आहेत. चारही बाजूंनी घेरलं आहे’. ते बोलत असताना वारंवार गोळीबार सुरु होता.
डीडी न्यूजची टीम कव्हरेजसाठी आली होती
आगामी विधानसभा निवडणुकीच्या कव्हरेजसाठी दिल्ली दूरदर्शनची टीम पोलीस जवानांच्यासोबत नक्षलवाद्यांचा गड असलेल्या नीलावाया भागामध्ये रिपोर्टिंग करण्यासाठी गेली होती. या दरम्यान नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एक गोळी थेट डीडीचे कॅमेरामन अच्युतानंद साहू यांना लागली. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी नक्षलवाद्यांकडून लागोपाठ गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले सुरुच होते.
नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्काराची दिली धमकी
डीआईडी नक्षल पी सुंदर ने या घटनेसंदर्भात सांगितले आहे की, आगामी विधानसभा निवडणुकींना लक्षात घेता सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस परिसरामध्ये सर्च ऑपरेशनसाठी निघाले होते. अरनपुरमध्ये पहिल्यांदाच वोटींग होणार आहे. नक्षलवाद्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे.
१२ नोव्हेंबरला ८ नक्षलग्रस्त जिल्ह्यात होणार मतदान
छत्तीसगडमध्ये पुढच्या महिन्यामध्ये विधानसभा निवडणुक होणार आहे. यंदा दोन टप्प्यामध्ये १२ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ८ नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये १८ जागांसाठी मदतान होणार आहे. यामध्ये बस्तर, कंकेर, सुकमा, बीजापुर, दंतेवाड़ा, नारायणपुर, कोंडागांव आणि राजनांदगांव जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहे. याचा निकाल ११ डिसेंबरला होणार आहे.