एकीकडे सगळ्या देशाचं लक्ष कर्नाटकमधल्या राजकीय महानाट्याकडे लागलेलं असतानाच दुसरीकडे अचानक गोव्यातल्या काँग्रेसच्या तब्बल १० आमदारांनी राजीनामे दिले. इतकंच नाही, तर त्यांनी थेट दिल्ली गाठून एकत्रच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे गोव्यातलं काँग्रेसचं संख्याबळ १५वरून ५वर आलं आहे. कर्नाटकमधल्या राजकीय पेचावर तोडगा काढण्यात व्यस्त असलेल्या काँग्रेसला गोव्यातल्या या १० आमदारांनी ‘जोरो का झटका धीरेसे’ दिला आहे. त्यामुळे काँग्रेससमोर नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, या १० बंडखोर आमदारांपैकी ३ आमदारांनी गोव्यात मंत्रीपदाची शपथ देखील घेतली आहे. त्यामध्ये फिलिप नेरी रॉड्रिग्ज, जेनिफर मॉन्सरेत आणि चंद्रकांत कवलेका यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबतच माजी विधानसभा उपसभापती मायकल लोबो यांनी देखील यावेळी शपथ घेतली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी या चौघांना गोपनीयतेची शपथ दिली.
Filipe Nery Rodrigues, Jennifer Monserratte, and Chandrakant Kavleka, three out of the ten MLAs who joined BJP from Congress recently, take oath as ministers in Goa Government. Former Deputy Speaker Michael Lobo also takes oath. pic.twitter.com/ns9PpK9CtA
— ANI (@ANI) July 13, 2019
कशी बदलली गोव्यातली राजकीय गणितं?
दरम्यान, या आमदारांच्या शपथविधीआधीच गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई, जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर या तिघांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून राजीनामा देण्याविषयी सांगण्यात आले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी या तिघांना हा निर्णय कळवला असून आता भाजप स्वबळावर गोव्यात सत्तेत आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती. पर्रीकरांनी गोव्यात स्थापन केलेलं आघाडी सरकार त्यांच्या निधनानंतर देखील कायम होतं. मात्र, काँग्रेसच्या १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यामुळे भाजपचे संख्याबळ विधानसभेत २७ इतके वाढले आहे. त्यामुळे आता हे आघाडी सरकार न राहाता भाजप सरकार झालं आहे.