देशात मान्सूनचे जोरदार आगमन झाले असले तरी गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. याचा परिणाम आता देशभरात पाहायला मिळत आहे. सतत वाढणाऱ्या उष्णतेमुळे नक्की हे पावसाचे दिवस आहेत असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. अनेक भागांत पाऊस नसल्याने उन्हाता चटका वाढत आहे. तर राज्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट आल्याने उकाड्यात कमालीची वाढ झाली आहे. देशात सतत वाढणाऱ्या उष्णतेमागे आफ्रिकेच्या वाळवंटातील वारे कारणीभूत आहेत. कारण गेल्या तीन आठवड्यांपासून देशभरात आफ्रिकेच्या वाळवंटातील वारे वाहत आहेत. तीन आठवड्यांपासून कोसळणाऱ्या मुसळधार मान्सूनला या वाऱ्यांमुळे आता अडथळा येत आहे. २१ जूनपासून आफ्रिकेन वाऱ्याने भारतीय मान्सूनवर गंभीर परिणाम केले आहे. यामुळे अनेक भागांत कोसळणारा पाऊस आता नाहीसा झाला आहे. ११ जुलैपर्यंत या वाऱ्याचा उपद्रव कायम राहणार असा अंदाज आहे. त्यानंतरच देशात पाऊस जोर धरेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी बुधवारी व्यक्त केला आहे.
दरम्यान जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा यंदा पावसाविना कोरडा गेला. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतीच्या कामाला लागलेल्या शेतकरी आता पुन्हा पावसाकडे डोळे लावून बसला आहे. परंतु जुलै उलटूनही पाऊस येत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. या आफ्रिकन वाऱ्यांमुळे नेमका भारतीय मान्सूनवर काय परिणाम झाला हे जाणून घेऊ या.
आफ्रिकन वार्यांमुळे मान्सूनला अडथळा
मान्सूनवर सतत देशात वाहणारे वारे आणि विदेशातून वाहणाऱ्या वार्यांचा परिणाम होत असतो. यंदाच्या मान्सूनवर विदेशातून वाहणाऱ्या वार्यांचा प्रभाव जाणवत आहे. देशाच्या चारही बाजूंनी वारे सतत वाहत असतात. या वाऱ्यांमुळे वातावरणात मोठा बदल होतो. यंदा आफ्रिकेतील वाळवंटीतून उष्ण वारे भारतात गेल्या तीन आठवड्यांपासून येत आहेत. हे येणारे वारे गरम असून ते वाळवंटातील धूलिकणही आपल्या सोबत आणत आहेत. यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवतेयं. हे वारे ढग गेल्यावर त्यातील बाष्प शोषून घेत आहेत. यामुळे पाऊस पडेल असे वाटते मात्र प्रत्यक्षात तो पडत नाही. या वाऱ्यांमुळे यंदा देशातील मान्सूनचे वेळापत्रक पूर्णपणे बदलून टाकले आहे. अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागातील माजी अधिकारी व ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. जयप्रकाश कुलकर्णी यांनी एका वृत्तपत्राला दिली.
देशात उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा होत्या कमी
यंदा उन्हाळ्यात वाऱ्याचा वेग अत्यंत कमी म्हणजे ताशी २ ते ३ कि.मी इतका होता. परंतु तो ७ ते ८ कि.मी असता तर यंदा चांगला मान्सून बरसला असता. तसेच मे महिन्यात सूर्यप्रकाशाचा कालावधी हा ७ ते ८ तास असला तर पुढे चांगला पाऊस पडतो; पण यंदा तो कालावधी फक्त चार तासांचा होता. यामुळे मे महिन्यातच यंदा पावसाने चांगली सुरुवात केली. परिणामी जूनचा शेवटचा आठवडा व जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने ओढ दिली. ११ जुलैपासून हवेचा दाब कमी झाला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा १३ ते १७ जुलैपर्यंत चांगला पाऊस होईल. या काळात शेतकर्यांनी पेरण्या केल्या तर फायदा होईल. तोवर पिकांना ड्रीपने किंवा अन्य मार्गाने पाणी देऊन जगवावे लागेल. अशी माहिती ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिली.
RBI ची देशातील १४ बँकांवर मोठी कारवाई, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठोठावला कोट्यावधींचा दंड