मुंबई : येत्या सोमवारी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे अयोध्येसह संपूर्ण उत्तर प्रदेश सजले आहे. देशभरात राममय वातावरण झाले आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मुलाखत एका वृत्तवाहिनीवर झाली. त्यात ते आपल्या पेहरावाबद्दल सांगत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एक प्रश्न उपस्थित केला असून त्याचीच चर्चा सुरू आहे.
हेही वाचा – Ajit Pawar : मोदी ऐंशीच्या पुढे गेल्यावर त्यांनाही विचारू; पटोलेंच्या टीकेला अजितदादांचे उत्तर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कायम भगव्या कपड्यांमध्येच असतात. शासकीय अथवा खासगी कार्यक्रम असला तरी, त्यांची वेशभूषा तीच असते. यावर त्यांनी या मुलाखतीत भाष्य केले आहे. घरात जे कपडे परिधान करतो, तेच कपडे बाहेर कार्यक्रमांमध्ये घालतो. व्यासपीठांवर देखील तेच कपडे असतात. देशात-परदेशात कुठेही गेलो तरी हेच कपडे परिधान करतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कपडे परिधान करून लोकांना मूर्ख बनवायचे आहे का? ही काही रंगभूमी नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
हे महाशय कुणा विषयी बोलता आहेत … pic.twitter.com/TGm5wqinTu
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 18, 2024
राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडीओ शेअर करताना ‘हे महाशय कुणाविषयी बोलत आहेत?’ असा प्रश्न विचारला आहे. यावरून अनेकांनी आव्हाड यांचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
लिनेने जॅकेटसह सॉफ्ट कलरचे खादी कुर्ते, काळा सूट, काळा चष्मा किंवा पारंपरिक पोशाखात पंतप्रधान मोदी दिसले आहेत. विशेषत: डिझायनर फेटे ही देखील त्यांची ओळख बनली आहे. 2014पासून 2023पर्यंत प्रत्येक वर्षी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना त्यांनी विविध रंगाचे फेटे बांधले होते. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चष्मा वापरण्याची खूप आवड आहे. त्यांना चांगल्या ब्रँडचे चष्मे आवडतात. मेबॅक ब्रँडचे चष्मे ते अधिक पसंत करतात, असे सांगितले जाते. त्यामुळेच जितेंद्र आव्हाड यांचा रोख त्यांच्यावरच होता, अशी चर्चा आहे.