भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची वयाच्या 93 व्या वर्षी प्राणज्योत मालवली. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईत दादर येथील शिवाजी पार्कवर काल 6 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींच्या जाण्याने संगीतातील एका युगाचा अंत झाला आहे. त्यामुळे जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. प्रत्येकाने आपापल्या परिने लतादीदींना आदरांजली वाहिली आहे. गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनामुळे, केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे, देशातील अनेक राज्य सरकारांनी आपापल्या राज्यांमध्ये राजकीय शोक जाहीर केला आहे. लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः मुंबईत आले होते. तर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लतादीदींना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे. बंगालमधील सार्वजनिक ठिकाणी 15 दिवस लतादीदींचे स्वर घुमणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत अशी घोषणा केली आहे.
I pay my heart-felt tribute to the departed icon of India, Bharatratna Lata Mangeshkar. (1/3)
— Mamata Banerjee (@MamataOfficial) February 6, 2022
लता मंगेशकर यांची गाणी पुढील 15 दिवस पश्चिम बंगालमध्ये सार्वजनिक ठिकाणी, सरकारी इमारती आणि ट्रॅफिक सिग्नलवर लावण्यात येणार आहेत. याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या सन्मानार्थ सोमवारी अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली. बंगाल आणि पूर्व भारतातील कलाकारांना मंगेशकरांनी दिलेल्या स्नेहाबद्दल ममता बॅनर्जी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
‘देशाचे महान व्यक्तिमत्व, भारतरत्न लता मंगेशकर यांना मी श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि जगभरातील त्यांच्या अब्जावधी चाहत्यांसाठी माझ्या मनापासून संवेदना. लतादीदी खऱ्या अर्थाने भारताची गानसम्राज्ञी होत्या. याशिवाय, जगभरातील त्यांचे सर्व चाहते आणि हितचिंतकांप्रमाणेच, त्यांच्या आवाजाने आणि अभिनयाने मंत्रमुग्ध झालो आहोत. आम्ही लतादीदींबाबत कृतज्ञ आहोत, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.
हे ही वाचा – Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं शिवाजी पार्कवर स्मारक उभारा ; भाजपाची मागणी