सीमा प्रश्नावरून भारत आणि नेपाळमधील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. कारण नेपाळने आपल्या नव्या नकाशात भारताच्या भागावर दावा केला आहे. या आधीही या लिपुलेख भागावरून नेपाळने भारताच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत नेपाळने नव्या नकाशाला मंजुरी दिली आहे.
नव्या नकाशात लिपुलेख, कालापानी, लिंपियाधुरा आदी भागांचा नेपाळच्या नकाशात समावेश करण्यात आला आहे. खरतर हे भाग भारताकडे आहेत. मात्र नेपाळच्या या नव्या नकाशावर अद्याप भारताने कोणतीच प्रतिक्रीया दिली नाहीये.
काय आहे नव्या नकाशात
लिपुलेख या भागाला विशेष महत्त्व आहे कारण या भागात भारत, नेपाळ आणि चीनची सीमा एकत्र येते. नेपाळच्या मंत्रिमंडळाने मंजूरी दिलेल्या नव्या नकाशामध्ये ७ प्रांत, ७७ जिल्हे आणि लिपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानीसह ७५३ स्थानिक प्रशासन मंडळही दाखवण्यात येणार असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ज्ञावली यांनी ट्विटरवर दिली.
नेपाळची नाराजी
मागील काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तराखंडमधील घाटीयाबादगड ते लिपुलेख या मार्गाचे उद्घाटन केले होते. या नव्या मार्गामुळे कैलास मानसरोवरला जाणाऱ्या भारतीयांचा वेळ वाचणार आहे. लिपुलेखसह भारताच्या सीमेवर सैन्यांची कुमक वाढवणार असल्याचे नेपाळने जाहीर केले होते.
हे ही वाचा – लॉकडाऊनमध्ये शोधा सेक्स पार्टनर, सरकारनेच दिला सल्ला!