मुझफ्फरपूर आणि देवरिया येथील बालिकागृहातील लैंगिक अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आता आणखी एका बालिका गृहात हा घृणास्पद प्रकार घडला आहे. ओडिसातील एका बालिकागृहात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले असून पोलिसांनी या बालिकागृहाला टाळे ठोकले आहे. त्यामुळे देशभरात अनाथ बालिकांच्या सुरक्षेसाठी सुरु केलेले बालिकागृह किती सुरक्षित आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहेत.
वाचा- देवरिया बालिकागृहाचे दरवाजे पुन्हा उघडले!
काय झाले मुलींसोबत ?
ओडिसातील धेनकनाल येथे एक सेवाभावी संस्था बालिकागृह चालवते. येथील अल्पवयीन मुलींनी केलेल्या तक्रारीत त्यांच्यावर लैगिंक अत्याचार झाल्याचे प्राथमिक माहितीतून कळाले. तातडीने सरदापर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी कारवाई करत मुलींना दुसऱ्या चाईल्ड केअर सेंटरमध्ये हलवले आणि सेवाभावी संस्थेच्या बालिकागृहाला टाळे ठोकले,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदर्भात ही संस्था चालवणाऱ्या चालकाला देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
वाचा- शेल्टर होममधील मुले देशाची मुले नाहीत का?- सुप्रीम कोर्ट
मुलींना कुठे पाठवले याची माहिती द्या- लेखाश्री समंतीश्रींगर, भाजप नेत्या
घटनेची माहिती मिळताच भाजपचा महिला मोर्चा अधिक चौकशीसाठी बालिकागृहात गेला होता. पण त्याआधीच बालिकागृहातील इतर मुलींना हलवण्यात आले होते. मुलींना कुठे नेण्यात आले या संदर्भातील अधिक माहिती देखील कोणालाही देण्यात आली नाही. आम्ही येण्याआधीच येथील मुलींना का हलवण्यात आले आणि आता आम्हाला या मुलींना कुठे नेले याची माहिती देण्यात आली नाही. हे चांगले नाही, असे भाजप नेत्या लेखाश्री समंतीश्रींगर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
वाचा- देवरिया बालिका गृह प्रकरण : ३ मुलांची परदेशात विक्री?
सुप्रीम कोर्टाने फटकारले
मुझफ्फरपूर आणि देवरिया प्रकरणातील तपासावर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी बालिकागृहातील मुले देशाची मुले नाहीत का? असा प्रश्न केला होता. शिवाय बिहार सरकारच्या तपासावर नाराजी व्यक्त केली होती. या कुकर्मासाठी जबाबदार असणाऱ्यांवर गंभीर गुन्हे लावून आरोपपत्र दाखल करा, असे देखील सांगितले होते.