भारतात दिवाळी सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. बाजरपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. तर अनेक राज्य़ांमध्ये ट्रेन आणि बसेस तुडुंब भरल्याचे पाहायला मिळतेय. मात्र या सगळ्यात कोरोनासंबंधीत नियमांचे पालन केले जात आहे का? यासंदर्भात एक अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. या अभ्यासानुसार, केवळ २ टक्के भारतीयांना वाटते की, मास्क वापरणे हा एक कोरोनावर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. तर ३ टक्के लोकांच्या मते त्यांच्या परिसरातील आणि जिल्ह्यातील लोक सामाजिक अंतराचे पालन करत आहेत. या अभ्यासात ९६ टक्के लोकांच्या मते, लोक सहलीदरम्यान सामाजिक अंतर पाळत नाहीत. त्याचवेळी १६ टक्के लोकांच्या मते, लोक प्रवासादरम्यानच मास्क वापरतात.
अभ्यासात ३५ टक्के महिलांचा सहभाग
देशातील ३६६ जिल्ह्यांतील २० हजारांहून अधिक लोकांकडून मिळालेल्या ३९ हजार मतांच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला आहे. त्यापैकी ४७ टक्के लोक टियर-१, ३० टक्के लोक टियर-२ आणि २३ टक्के लोक टियर-३ आणि ४ जिल्ह्यांतील आहेत. यापैकी ६५ टक्के पुरुष आहेत, तर ३५ टक्के महिला आहेत.
देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रसार पाहता, कोविड प्रोटोकॉल सध्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक उपायांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्याचे कोविड प्रोटोकॉल ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील.