नवी दिल्ली: मदरसा हा शब्द अस्तित्वातून नाहीसा झाला पाहिजे आणि शाळांमध्ये सर्वांसाठी सामान्य शिक्षणावर भर दिला गेला पाहिजे, असं विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी केले. जोपर्यंत मदरसा हा शब्द आहे, तोपर्यंत मुले डॉक्टर आणि इंजिनीअर होण्याचा विचारही करू शकणार नाहीत. जर तुम्ही त्यांना (विद्यार्थ्यांना) सांगितले की जर त्यांनी मदरशांमध्ये शिकले तर ते डॉक्टर किंवा इंजिनीअर होणार नाहीत, तर ते स्वतःच जाण्यास नकार देतील. तुमच्या मुलांना कुराण शिकवा, पण घरी. मदरशांमध्ये मुलांना प्रवेश देणे हे त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन आहे, असे म्हणत त्यांनी मदरशांवर जोरदार हल्ला चढवला. दिल्लीतील एका कार्यक्रमाला आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी उपस्थिती लावली होती, त्यावेळी ते बोलत होते.
विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनीअर, शास्त्रज्ञ बनवले पाहिजे
सर्व मुलांना विज्ञान, गणित, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र शिकवण्यावर भर द्यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले. सरमा म्हणाले की, विद्यार्थ्यांना असे शिक्षण दिले पाहिजे, ज्याद्वारे ते डॉक्टर, अभियंता, प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ बनतील.
मदरशात शिकणारी मुलं हुशार असतात
मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांचे कौतुक करताना ते म्हणाले की, मदरशातील विद्यार्थी खूप हुशार असतात, ते कुराणातील प्रत्येक शब्द सहज लक्षात ठेवू शकतात. सरमा म्हणाले, ‘भारतातील सर्व मुस्लिम हिंदू होते. भारतात एकही मुस्लिम जन्माला आला नाही. भारतात प्रत्येक जण हिंदू होता. त्यामुळे जर कोणताही मुस्लिम मुलगा अत्यंत हुशार असेल तर त्याचे अंशतः श्रेय मी त्याच्या हिंदू भूतकाळाला देईन. आसाम सरकारने 2020 मध्ये धर्मनिरपेक्ष शिक्षण प्रणाली सुलभ करण्यासाठी सर्व सरकारी मदरसे विसर्जित करण्याचा आणि त्यांना सामान्य शैक्षणिक संस्थांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुवाहाटी उच्च न्यायालयाने आसाम निरसन कायदा, 2020 वर शिक्कामोर्तब केले, ज्या अंतर्गत राज्यातील सर्व प्रांतीय (सरकारी अनुदानित) मदरसे एकाच वर्षात सामान्य शाळांमध्ये रूपांतरित केले जातील.
हेही वाचाः इंधन दर कपातीचा दुहेरी दिलासा!