बॉलिवूडची धाकड गर्ल अभिनेत्री कंगना रनौत वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेचा विषय ठरते. कंगनाने नुकतंच पद्मश्री पुरस्कार स्वीकारल्यानंतर एका चॅनलच्या मुलाखतीत उपस्थिती दर्शवली. या मुलाखतीत कंगानाने भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य भीक होती, खरे स्वातंत्र हे २०१४ साली मिळाले. असे वादग्रस्त वक्तव्य केलं. कंगनाच्या या वक्तव्यावर बॉलिवूड कलाकारांपासून ते राजकीय नेत्यांनी जाहीर निषेध नोंदवला. तर कंगनाचा पद्मश्री पुरस्कार परत घेत तिच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी होऊ लागली आहे. अशातच कंगनाची एक मोठी इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये कंगनाने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.
कंगनाने बीबीसी न्यूजची एक जुनी बातमी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या फोटोला कंगनाने भली मोठी कॅप्शन दिली आहे. या कॅप्शनमध्ये कंगानाने लिहिले की, “२०१५ रोजी बीबीसीने हा लेख प्रसिद्ध केला होता. या लेखात युक्तिवाद करण्यात आला की, ब्रिटनने भारताला कोणतीही भरपाई देणे आवश्यक नाही. मग गोरे साम्राज्यवादी किंवा त्यांचे समर्थक का आणि कशासाठी अशा मूर्ख गोष्टी लिहू शकतात? जर तुम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मी ‘टाइम्स नाऊ’ समिटमध्ये केलेलं वक्तव्य हे याचं उत्तर मिळेल,” असे कंगना म्हणाली.
“भारतात घडलेल्या अगणित गुन्हेगारीच्या घटनांसाठी आपल्या राष्ट्र निर्मात्यांनी इंग्रजांना दोष दिला नाही. त्यांनी आपल्या देशाची मालमत्ता लुटली, देशाची दोन भागात फाळणी केली आणि आमच्या स्वातंत्र्यसैनिकांची हत्या केली,” असे कंगना म्हणाली.
View this post on Instagram
“दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटीशांनी स्वत:च्या इच्छीने भारत सोडला. यावेळी विंस्टन चर्चिल स्वत:ला एक युद्ध नायक म्हणवत होते. मात्र हीच व्यक्ती बंगलाच्या दुष्काळासाठी जबाबदार होती. स्वतंत्र भारतात त्याच्या या गुन्ह्याबद्दल त्याला कधीही शिक्षा झाली का? नाही. सिरिल रॅडक्लिफ गोरा इंग्रज यापूर्वी भारतात कधीच आला नव्हता. मात्र ब्रिटिशांनी त्याला अवघ्या ५ आठवड्यांसाठी फाळणी करण्यासाठी आणले. काँग्रेस आणि मुस्लीम लीग या समितीच्या सदस्यांनी ब्रिटिशांच्या अटींनुसार फाळणीला परवानगी दिल्याने लाखो लोकांचे प्राण गेले. यात ज्यांचे प्राण गेले त्यांना स्वातंत्र्य मिळाले का? या हत्याकांडासाठी ब्रिटिश किंवा ज्या काँग्रेसने या फाळणीला सहमती दिली यावेळी हे घडले, मात्र इंग्रजांना का जबाबदार धरले नाही?” असा जहरी प्रश्न तिने उपस्थित केला.
कंगनाच्या या वक्तव्यांवर आता काँग्रेस, आम आदमी पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अशा अनेक पक्षांच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यात आम आदमी पार्टीने कंगनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली आहे. भाजपा खासदार वरुण गांधी यांनीही कंगनाच्या वक्तव्यावर टीका करत त्याची तुलना देशद्रोहाशी केली आहे.