घरताज्या घडामोडीबोहारणीच्या अर्थशास्त्राला महागाईची झळ

बोहारणीच्या अर्थशास्त्राला महागाईची झळ

Subscribe

बांबूच्या काड्यांपासून बनवलेली पाटी डोक्यावर घेवून गावा-गावात पायी फेरफटका मारुन सासूरवासीनींची पोत ओवणारी, टिकली, बांगडी अन् क्लिप पुरवणारी महिला म्हणजे बोहारिण. पावसाळ्याचे चार महिने सोडले तर उर्वरित आठ महिन्यांतील प्रत्येक आठवड्याला गावात येणारी बोहारिण आपला व्यावसाय नित्यनियमाने चालवत होती. विशेष म्हणजे तिच्या या पाटीभर भांडवलाच्या व्यवसायावर तिच्या स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत होता. एखाद्या महिलेकडे पैसे नसतील तर तिला आठवड्याची सवलतही देण्याची क्षमता या बोहारणीमध्ये होती. वाढत्या महागाईमुळे बोहारणीचे अर्थशास्त्र तर बिघडले पण सर्वसामान्य जनतेचे जगणेही अवघड झाले आहे.

गावात येऊन आपला छोटासा व्यावसाय चालवणारी बोहारिण फक्त पैशांसाठीच काम करत नसे. तर तिला गावातच जेवणही मिळत होते आणि धान्यही. त्यामुळे तिच्या व्यावसायातून संपूर्ण कुटुंब निर्धास्तपणे जगत होते. हळूहळू तंत्रज्ञानाचा विकास होत गेला आणि शेतीचे अर्थकारणही बदलत गेले. भाजीपाला, फळपिकांचे उत्पादन वाढत गेले त्याप्रमाणात शेतकर्‍यांकडे पैसा वाढत गेला. आपल्या गरजा भागवण्यासाठी शेतकरी गावातून तालुक्याला नियमितपणे येऊ लागला आणि येथूनच तो वस्तूंची खरेदी करू लागला. त्यामुळे गावातील अर्थचक्राला शहरातील व्यावसायिकांची जोड मिळू लागली. पर्यायाने गावापर्यंत मर्यादित असलेल्या गरजा शहरांपर्यंत जाऊन पोहोचल्या. पूर्वी महिनोन महिने शहरात न गेलेल्या महिला आता महिन्यात एक-दोनदा शहरात जायला लागल्या. त्यातून कुटुंबाचा खर्च वाढला; परंतु, बोहारणीचे अर्थशास्त्रही बिघडले. स्वयंपाक चुलीवर होत असल्यामुळे गॅसची आवश्यकता नव्हती. त्याचे दर वाढले काय आणि कमी झाले काय, याचे फारसे काही सोयरसुतक कुणाला वाटले नाही. घरच्या शेतीतच बख्खळ धान्य पिकत असल्याने एक-दोन पायली धान्य बोहारणीच्या पदरात टाकताना महिलांनी फारसा कधी विचार केला नाही. उलट बाजरीच्या जोडीला गव्हाचे उत्पादन व्हायला लागले म्हणून आनंद द्विगुणीत झाला. या आनंदात बोहारणीला सहभागी करुन घेतले जात असे. त्यामुळे सणावाराला बोहारणीच्या घरीही पुरणपोळी व आंबेरसाचा बेत होऊ लागला. घरी आंबेरस केला नाही तरी गावातून तिला पोळ्या आणि रस हमखास मिळेल, याची खात्री तिला होतीच. पण वाढत्या शहरीकरणासोबत खर्चही वाढला आणि आवडीनिवडी बदलत गेल्या. गावात शिवून मिळणारी पोत आता सोनाराच्या दुकानात गेली. त्याला सोनेरी साज चढला. शेतात आता भाजीपाला, ऊस, कांदे, मका, द्राक्ष अशी नगदी पिके होऊ लागल्याने हाती चार पैसे यायला लागली. परिणामी, चारचाकी गाडीत फिरणे, ट्रॅक्टरने शेती नांगरणे, पिकांवर महागड्या औषधांची फवारणी होऊ लागल्याने खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला. वाढत्या खर्चासोबतच शेतकर्‍यांचे आर्थिक गणितही बिघडत गेले. शहरापर्यंत मर्यादित असलेल्या महागाईच्या झळा आता गावातील शेतकर्‍याला सोसाव्या लागत आहेत. 350 रुपयांचा गॅस आता एक हजारांवर पोहोचला आहे. शेतकर्‍यांच्या खात्यावर वार्षिक दोन हजार रुपये येणार याचा गावभर गाजावाजा करणार्‍या केंद्र सरकारने गॅसची सबसिडी कधी काढून घेतली हे कुणालाही कळले नाही. गॅस महागल्याने अगोदरच करपलेल्या भाकरीवर इंधनाच्या भडक्याने तेल ओतले. पेट्रोल 125 रुपयांच्या जवळ आहे तर डिझेल 100 रुपयांवर पोहोचले आहे. इंधन दरवाढीचा परिणाम महागाईवर झाला आहे. चहापासून ते घरांच्या किमतींपर्यंत सर्वांचे दर गगनाला भिडले आहेत. सिमेंट, स्टीलचे भाव दुप्पट झाल्यामुळे घरांचे स्वप्न महागले. कोरोना नंतरच्या काळात अचानकपणे आलेल्या महागाईचा सामना करताना सर्वसामान्य कुटुंबाचे हाल होताना दिसतात. या तुलनेत शेतकरी असतील किंवा शहरातील मध्यमवर्गीय यांच्या उत्पन्नात फारसा फरक पडलेला नाही. किंबहुना, घटच झालेली दिसते. त्यामुळे महागाईचे चटके त्यांना जास्त बसत आहेत. महागाईच्या तुलनेत अनेकांचे वेतन अत्यंत तुटपुंजे आहे.

बोहारणीच्या अर्थकारणातून आपल्याला एकच शिकवण मिळाली होती की, धान्य दिले तरी त्याबदल्यात आपल्या गरजा भागत होत्या. धान्य घेण्यासाठी घरापर्यंत लोक येत होते. म्हणजे आपल्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार आपल्याला होता. परंतु, आता आपण धान्य बाजारात घेऊन जातो तरी आपल्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार आपल्याला राहिलेला नाही. दुसरी गोष्ट पूर्वी आपल्या गरजा कमी असल्यामुळे सासूरवासी महिलांना माहेरकडून मिळालेले चार-दोन रुपये सांभाळून ठेवण्याची सवय होती. वर्षानुवर्षे पैसे तसेच साठवून ठेवल्यामुळे काटकसरीत जीवन जगण्याची सवय जडली होती. बोहारिण घरासमोर आली आणि सासू घराबाहेर उभी असेल तर सून तिला मागच्या दाराला येण्यास सांगायची. सासूने काय घेतले हे सूनेला माहीत होत नव्हते आणि सूनेने काय घेतले हे सासूला कळत नव्हते. त्यामुळे दोघांच्याही गुप्तता पाळण्यातच बोहारणीचे अर्थकारण दडले होते. याचा अर्थ आपल्याकडे काही वस्तू आहे, हे दाखवण्याची पूर्वी हौस नव्हती. आता त्याची स्पर्धा सुरू झाली आहे. ‘सासू एक नंबरी तर सून दस नंबरी’ असे उपरोधिकपणे म्हटले जाते. त्यातूनच सासू आणि सून यांच्यातील भांडणांची सुरुवात झालेली दिसते. सारख्या सूचना म्हणजे ‘सासू’ आणि सूचना नको म्हणजेच ‘सून’ अशा अर्थाने ही नावे घेतली जातात. एकत्र कुटुंबपध्दती लयास जाण्यामागे शिक्षण हा एक फार मोठा घटक कारणीभूत समजला जातो. महिला शिक्षित झाली आणि दोन्ही घरांची प्रगती झाली. परंतु, घरापर्यंत मर्यादित असलेल्या महिला आता नोकरी करतात. स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्यामुळे त्यांना कुणाची गरज वाटत नाही.

- Advertisement -

‘स्वावलंबी’ या नावाखाली त्या स्वत:च्या मर्यादित जगात वावरु लागल्या आणि त्यांना बंधने नको वाटू लागली. सासू, सासरे हे तर अडचणीचे ठरत असल्याने लग्नानंतर तातडीने विभक्त होण्याचे प्रकार अलिकडील काळात फार वाढले आहेत. त्यातून स्वत:चा संसार आणि मुले यातच महिला धन्यता मानतात. एकत्रित कुटुंबपध्दतीचे गुण त्यांना कधी माहीत पडलेच नाहीत. स्वत:च्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्‍या महिलांचे प्रमाण वाढल्याने पुरुषांचे आर्थिक समीकरण बघिडले आहे. विशेषत: मध्यमवर्गीय पुरुष हे महागाईच्या झळा सोसत आहेत. जेव्हा देशाची निर्यात ही आयातीपेक्षा जास्त असते, तेव्हा आपल्या मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. त्यामुळे आपल्या देशातील वस्तू स्वस्त मिळू शकतात. आपल्याला बर्‍याच गोष्टी या आयात कराव्या लागतात. त्यामुळे जगभरात युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली किंवा मोठी नैसर्गिक आपत्ती कोसळली तर त्याचा तात्काळ आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. खनिज तेल हे अतिशय आवश्यक आहे, ते अर्थव्यवस्थेचेच इंधन आहे. पण आपल्याकडे त्याचे फारच कमी उत्पादन होते. त्यासाठी आपल्याला तेलउत्पादक देशांवर पूर्णत: अवलंबून रहावे लागते. आता रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा परिणाम भारतावर पडला आहे. कारण बर्‍याच वस्तू आपण रशिया आणि युक्रेनकडून आयात करत होतो. पण आता त्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आपल्याला महागाईच्या झळा बसत आहेत. स्वयंपूर्ण होण्यासाठी भारताला अन्य पर्याय शोधावे लागतील.

जागतिक मंदीच्या काळातही भारताला आर्थिक झळ फारसी बसली नाही, यामागे बोहारणीचे अर्थशास्त्र हा फार महत्वाचा घटक होता. काटकसीचे आयुष्य जगण्याची सवय ही फार अडचणींना जन्माला घालत नाही. उधळपट्टी करण्याची सवय पाश्चात्य देशातील नागरिकांना असल्यामुळे जागतिक मंदीत त्यांची दिवाळखोरी निघाली. कोरोनानंतरचा काळ हा अशाच स्वरुपाचा आहे. त्यानंतर आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या देशांमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. भारताशेजारील श्रीलंका, पाकिस्तान हे देश डबघाईस जाण्याच्या मार्गावर आहेत. भारतातील जनता महागाईच्या झळा सहन करत जगते आहे. अर्थतज्ज्ञ हे महागाईचे विश्लेषण करतील; परंतु, सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आपण सरकारवर दोष देऊन मोकळे होऊ. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युध्दाचे परिणाम म्हणून इंधन दरवाढ झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आपण इतर देशांवर किती प्रमाणात अवलंबून आहोत, याचीही प्रचिती येते. अर्थशास्त्रात ‘प्रॉडक्ट’ म्हणजे वस्तू आणि ‘सर्व्हिसेस’ म्हणजे ‘सेवा’ अशा संज्ञा वापरल्या जातात. आता आपली अर्थव्यवस्था ‘सर्व्हिस सेक्टर’वर आधारीत आहे. हा व्यवहार तर थेट बोहारणीच्या व्यवहाराशी मिळताजुळता आहे. बोहारिण पातेलं बनवीत नाही, ती पातेल्यांचा व्यापारही करीत नाही, ती फक्त ‘एक्स्चेंज’ करते. पातेल्यांच्या बदल्यात आलेले कपडे शिवून, साफ करून, कधी इस्त्री करून गरिबांच्या जुन्या बाजारात विकते आणि त्यातून आलेल्या पैशातून संसार करते! पोत ओवण्याची कला फक्त तिला अवगत होती. परंतु, काळानुरुप व्यवसाय बदलत गेला, तसे तिने मार्केटिंगचा नवा फंडा वापरला. जुने कपडे घेऊन भांडी देणे, केसांवर फुगे विकण्याचा व्यावसाय तिने स्वीकारला. त्यामुळे तिच्याकडे थोड्याफार प्रमाणात पैसा येऊ लागला. अशाच स्वरुपाचे अर्थशास्त्र सर्वांचे बदललेले बघायला मिळते. ग्रामीण भागात पिकवले जाणारे धान्य शहरातील व्यक्तींना खायला हवे आहे, पण अगदी स्वस्तात. याउलट कपडे ब्रॅण्डेड हवेत. मॉल्समध्ये जावून खरेदी करताना महागाईचा विसर पडत चाललेल्या नागरिकांना क्रेडिट कार्डच्या आभासी जगात कर्जाची भीती वाटत नाही. बचत करण्यापेक्षा आपण अधिक श्रीमंत आहोत, याचे प्रदर्शन करण्याची संस्कृती वाढीस लागल्याने आर्थिक घडी विस्कटली आहे. बोहारणीच्या अर्थशास्त्रातून बोध घेण्यापेक्षा आपण उधळपट्टीची जीवनशौली स्वीकारली. त्यामुळे महागाईच्या झळा सहन होत नसताना खर्च कमी केला नाही तर एक दिवस दिवाळखोरीत गेल्याशिवाय राहणार नाही. राजकीय व्यक्तींवर दोषारोप करुन फक्त तात्पुरते समाधान मिळेल. पण, आर्थिक दिलासा हवा असेल तर बचतीचे मार्ग स्वत:लाच निवडावे लागतील. त्याची अमंलबजावणी केली तरच जगणे सुसाह्य होईल नाहीतर आरोप-प्रत्यारोपांच्या गर्तेत आपणही हरवून जावू, अगदी बोहारणीप्रमाणे!

- Advertisement -

 

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -