घरफिचर्समायमहानगर ब्लॉगचीन भारताविरोधात युद्ध छेडेल?

चीन भारताविरोधात युद्ध छेडेल?

Subscribe

नेहरूंच्या जागी इंदिरा गांधी आल्यावर आणि त्यांनी बांगलादेश मुक्ती युद्ध पुकारल्यावर चिनी नेते आपल्या पाकिस्तानी मित्राच्या मदतीलाही उभे राहिले नव्हते. अशा लोकांनी डरकाळ्या फोडाव्यात. त्यांचा ड्रॅगन चित्रात कितीही भयंकर दिसत असला, तरी व्यवहारात त्याच्या नाकातोंडात धूर केला तर घुसमटू लागणार आहे. ड्रॅगनचे दिवस पुराणकालीन झाले असून सोयीनुसार रंग बदलणार्‍या सरड्याने ड्रॅगनच्या आवेशात बोलणे सोपे असले, तरी आग ओकण्याची कल्पनाही त्याला सोसणारी नसते.

कोरोनाची उत्पत्ती ही चीनमधूनच झाली, असा आरोप आता जगातील सर्व देश करू लागले आहेत. ज्या कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला. लाखोंच्या वर माणसे मारली. जगाची अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकली तो कोरोना चीनच्या लष्करी प्रयोगशाळेत तयार करण्यात आला होता. तेथूनच तो पसरला असा स्पष्ट आरोप आता अमेरिका करू लागली आहे. त्यासाठी आवश्यक पुरावेही शोधण्याचे काम अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएने हाती घेतले आहे. इतकेच नव्हेतर काही पुरावे आपल्या हातात आहेत, असा दावाही अमेरिकेने केला आहे. कोरोनाचा विषाणू हा चीनने जैविक अस्त्र म्हणून तयार केला. तो वुहानच्या सूक्ष्मजीव प्रयोगशाळेतून बाहेर पडला. त्यामुळेच जगाला कोरोनासारख्या महामारीचा सामना करावा लागला, असा या अमेरिकेच्या दाव्याला आता जगभर पाठिंबा मिळत आहे. इतकेच नव्हेतर चीनच्या लष्करी प्रयोगशाळेत कोरोनासारखे किमान ३५ वेगवेगळे विषाणू आहेत, ज्याचा वापर चीन कुठल्याही राष्ट्रांविरोधात जैविक अस्त्रासारखा करू शकतो, असेही सांगितले जात आहे. चीनबद्दल या अशा दाव्यांमुळे आज जगात चीनची प्रतिमा मलिन झाली आहे. जगातील सर्व देश एक-एक करून चीनच्याविरोधात जात आहेत.

अशा परिस्थितीत चीन नेमकी काय भूमिका घेईल, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. काही आंतरराष्ट्रीय विषयाचे तज्ज्ञ आगामी काळात चीनविरुद्ध अमेरिका असे विश्व युद्ध होण्याची शक्यताही वर्तवत आहेत. पण खरंच असे विश्व युद्ध शक्य आहे का? चीनचा व्यापार हा संपूर्ण जगात पसरला आहे. इतकेच नव्हेतर चीनने जगभरात अनेक राष्ट्रांना अब्जावधींची कर्जे दिली आहेत. त्यामुळे चीन युद्धाचा पवित्रा घेणार नाही, असेही एक शक्यता आहे. मग चीन नेमके काय करेल? तर जगाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी चीन भारताविरुद्ध आक्रमक पवित्रा किंवा छोटे युद्ध छेडण्याचे धाडस करू शकतो, असे काही अमेरिकन तज्ज्ञांचे मत आहे. त्याबाबत त्यांनी भारताला सर्तकतेचा इशाराही दिला आहे. पण चीन खरंच असे धाडस करू शकतो का? भारत हा पूर्वीसारखा लेचापेचा राहिला नाही, हे गलवान प्रांतात भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्यातून दिसून आले आहे. मात्र चीन जगातील आपली व्यापारपेठ अबाधित राखण्यासाठी आपल्या सैनिकांनाही मारण्याचे धाडस करू शकतो, असे आतापर्यंत एकंदरीत चिनी इतिहासातून दिसून येते.

- Advertisement -

मागल्या तीनचार दशकात आपल्या प्रचंड लोकसंख्येचा कच्चा माल म्हणून वापर करताना चीनने प्रगत पाश्चात्य देश व अन्य ठिकाणच्या कंपन्यांना मायदेशी आणून स्वस्तातली मजुरी उपलब्ध करून दिली. त्यासाठी सरकारच मजूर कंत्राटदार होऊन गेले आणि स्वस्तातल्या मजुरीतलाही काही हिस्सा बळकावून, त्याने भांडवल उभारले आहे. ते जगभर गुंतवण्यातून जे काही आर्थिक औद्योगिक साम्राज्य उभे केले, त्यालाच आजचे चिनी राज्यकर्ते महाशक्ती मानत असावेत. पण वस्तुस्थिती तितकीशी खरी नाही. चीनचा विकास बहुतांश प्रमाणात पूर्वेच्या बाजूला केंद्रित झालेला आहे आणि पश्चिम भागामध्ये आजही जुनेच दारिद्य्र व गरीबी नांदते आहे. त्या गरीबीची मुस्कटदाबी चालू असल्याने असंतोषाचा ज्वालामुखी दबलेला आहे. संधी मिळाल्यास तो उफाळून येऊ शकतो. अधिक जागतिक महत्वाकांक्षा बाळगताना चीनने जगभर केलेली गुंतवणूक तशी लाभदायक मानता येणार नाही. तत्कालीन लाभ बघूनच अशी गुंतवणूक झालेली आहे.

प्रामुख्याने शेजारी पाकिस्तानात केलेली मोठी गुंतवणूक एकूणच जिहादी संकटाने व्यापलेली आहे. अशा स्थितीत भारताला युद्धाच्या धमक्या देण्याच्या परिस्थितीत चीन नाही. कारण तो आता पूर्वीसारखा नुसता कोट्यवधी लोकसंख्येचा देश नसून व्यापक उद्योगक्षेत्र पसरलेला देश आहे. त्याला आपल्या उद्योगांना युद्धाच्या खाईत लोटण्याची हिंमत सहजासहजी होऊ शकत नाही. म्हणूनच नुसत्या पोकळ धमक्या देणे किंवा हुलकावण्या देणे ही वेगळी गोष्ट आहे आणि १९६२ च्या युद्धाचे स्मरण करून देणे, नुसत्याच वल्गना आहेत. तितक्या शक्तीनिशी युद्धात उतरण्याची सवयही आता चिनी लालसेनेला राहिलेली नाही. दिखावू समारंभात पाय आपटून संचलन करण्याने कोणी युद्धसज्ज सेना होत नाही. त्यापेक्षा कमी साधनातही भारतीय सेना अधिक सज्ज आहे. कारण आपण मागली दोन दशके जिहादला तोंड देत आहोत.

- Advertisement -

मागल्या सात दशकात चीनने किती युद्धे केली आणि किती विजय साजरे केले? त्याची इतिहासात कुठे नोंद नाही. दुसर्‍या महायुद्धानंतर जगातले अनेक देश स्वतंत्र झाले आणि अनेक देशात कम्युनिस्ट क्रांतीही झाली. त्यातलाच एक देश चीन आहे. आरंभी माओच्या नेतृत्वाखाली जी आक्रमकता चीन दाखवू शकला व त्याने तिबेट घशात घातले, त्याला लालसेनेच्या पराक्रमापेक्षा भारताचे नेभळट नेतृत्व जबाबदार होते. चिनी फसव्या मैत्रीत गुंतून पडलेल्या नेहरूंनी भारतीय सेना पांगळी ठेवूनच चिनी सेनेला रेल्वेगाडीतली जागा काबीज करावी, तसा तिबेट खाऊ दिला होता. त्यापेक्षा १९६२ च्या युद्धाची महत्ता अधिक नाही. पण त्याहीपेक्षा चीनची खरी कसोटी व्हिएतनाम स्वतंत्र झाल्यावरच्या संघर्षात लागलेली आहे. त्या इवल्या नवस्वतंत्र देशाला आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयास चीनने लालसेनेला पुढे करून केलेला होताच. त्याचे फलित काय होते? अल्पावधीतच लालसेनेला शेपूट घालून व्हिएतनामच्या भूमीतून माघार घ्यावी लागलेली होती.

तेव्हा व्हिएतनाम दीर्घकालीन युद्धाने उध्वस्त झालेला देश होता आणि सावरलेलाही नव्हता. तरी त्याच्यासमोर लालसेनेला टिकाव धरता आला नाही. अशा लालसेनेचे कौतुक आज चिनी मुत्सद्दी कोणाला सांगत आहेत? व्हिएतनामच्या तुलनेत भारतीय सेना खूप मोठी व सुसज्ज आहे आणि पाकिस्तानच्या कृपेने सतत प्रात्यक्षिकात राहिलेली आहे. तितकी चिनी लालसेना युद्ध वा तत्सम परिस्थितीला सज्ज राहिलेली नाही. पैसा व संख्या अधिक साधने दाखवून व्हिएतनामला झुकवता आले नाही, ते भारतीय सेनेला फक्त हुलकावण्या देतील. बाकी अधिक काही करू शकणार नाहीत. खरे तर चीनला वेसण घालण्यासाठीच अमेरिका भारताशी दोस्ती वाढवते आहे, त्याच्या चिंतेने चीनला घाम फुटला आहे. म्हणून मग सिक्कीम भूतानच्या सीमेवर लपंडाव खेळला जात आहे.

भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी त्याच दुखण्यावर बोट ठेवलेले होते. १९६२ आणि २०१७ यात मोठा फरक आहे असे जेटली म्हणतात, त्याचा हाच अर्थ आहे. १९६२ इतकी आजची चिनी लालसेना युद्धाला उत्सुक व सज्ज राहिलेली नाही. तेव्हाची लालसेना राजकीय भूमिकेने प्रेरीत होती, ती वैचारिक धारणा आता त्यात राहिलेली नाही. चीनमध्ये आज ते क्रांतीच्या पिढीचे नेतृत्व राहिलेले नाही आणि गरीबीत हाल काढण्याचे अनुभव तिथल्या नेतृत्वापाशी नाहीत. गरीबीत गमावण्यासारखे काही नसते. पण जेव्हा संपती व ऐश्वर्याची साधने गोळा होतात, तेव्हा लढायची हौस कमी होते. नुकसानाची भीती सतावते आणि तडजोडीला प्राधान्य मिळत असते. शक्य तितक्या हुलकावण्या देऊन व दमदाटीने हेतू साध्य करण्याची मुत्सद्देगिरी त्यातूनच येत असते. चीनची आजची भाषा त्यापेक्षा वेगळी नाही. म्हणूनच तिथल्या मुत्सद्दी मंडळींनी १९६२ चा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

पण नेहरूंच्या जागी इंदिरा गांधी आल्यावर आणि त्यांनी बांगलदेश युद्ध पुकारल्यावर चिनी नेते आपल्या पाकिस्तानी मित्राच्या मदतीलाही उभे राहिले नव्हते. अशा लोकांनी डरकाळ्या फोडाव्यात. त्यांचा ड्रॅगन चित्रात कितीही भयंकर दिसत असला, तरी व्यवहारात त्याच्या नाकातोंडात धूर केला तर घुसमटू लागणार आहे. ड्रॅगनचे दिवस पुराणकालीन झाले असून सोयीनुसार रंग बदलणार्‍या सरड्याने ड्रॅगनच्या आवेशात बोलणे सोपे असले, तरी आग ओकण्याची कल्पनाही त्याला सोसणारी नसते. ही आजच्या चीनची वस्तुस्थिती आहे. लढाई नको म्हणून संयमाने वागणार्‍या भारताला आव्हान देणे चीनच्या आवाक्यातली गोष्ट राहिलेली नाही. कारण युद्धाची भीती जितकी भारताला आहे तितकीच चीनलाही आहे. दोघांना युद्ध नको असेल, तर एकाने हुलकावण्या देऊन काय साध्य होणार आहे? सीमेवर आट्यापाट्या खेळण्यापेक्षा टेबलावर बसून वाटाघाटी करणे हा शहाणपणाचा मार्ग असतो.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -