मालेगावमध्ये काँग्रेस महापालिकेला मोठा धक्का बसणार आहे. कारण मालेगाव महापालिकेतील काँग्रेसचे सर्व २८ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मागील दशकं काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळणारे आमदार रशीद शेख आणि महापौर ताहेरा शेख देखिल प्रवेश करणारं आहेत. नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती असणार आहे.
आमची संपूर्ण पिढी काँग्रेस पक्षामध्ये होती
काँग्रेस पक्ष पहिल्यासारख्या विचारांचा पक्ष राहिलेला नाहीये. आमची संपूर्ण पिढी काँग्रेस पक्षामध्ये होती. त्यामुळे काँग्रेससोबतची आमची नाती घट्ट आहेत. देशभरात काँग्रेसची परिस्थिती बिघडली असली तरीसुद्धा मालेगाव शहरात काँग्रेसचे आमदार, महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष आणि महापालिकेत सर्वाधिक संख्या काँग्रेसची होती आणि आजही आहे. परंतु आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असं महापौर ताहेरा शेख यांनी म्हटलं आहे.
ताहेरा शेख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, मागील दोन वर्षांपासून आम्ही मालेगाव शहरातील विकास कामांच्या निधीबाबत मागणी करत आहोत. परंतु काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते त्यांच्या भेटीसाठी वेळच देत नाहीयेत. माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण , बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांसारखे दिग्गज नेते नगरसेवकांना भेटचं देत नसल्याची तक्रार महापौरांनी केली.
काँग्रेस पक्षाला इतक्या मजबूतीसारखं सांभाळलं. मात्र आम्हाला दोन वर्ष पूर्ण झाले असून आतापर्यंत न्याय मिळाला नाही. विलासराव देशमुख होते तेव्हा आम्हाला मालेगावसाठी न्याय मिळत होता. महाराष्ट्र राज्यात विलासराव देशमुख यांच्या काँग्रेसची टीम होती. तसेच सर्वांना सोबत पुढे घेऊन जाणारे नेते होते. जेव्हाही आम्ही त्यांच्याकडे मागणी केली असता मालेगावच्या विकासासाठी त्यांनी आम्हाला मदत केली. प्रत्येक कार्यकर्त्याला ते ओळखत होते. मात्र, आताच्या सरकारमध्ये मागील दोन वर्षांपासून पत्र व्यवहार करून सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारचा निधी मिळालेला नाहीये, असं वक्तव्य करत काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांनी दिग्गज नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असल्याचं दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. आघाडीत कोंडी होत असल्याची तक्रार काँग्रेसने केली आहे. ऊर्जा किंवा महिला-बाल कल्याण खात्याला मिळाणारा निधी किंवा ओबीसी आरक्षणासंदर्भातील माहितीची देवाणघेवाण यासंदर्भात महाविकास आघाडीचा समन्वय वारंवार समोर आला आहे. त्यामुळे विरोधकांना टीका करण्यासाठी संधी मिळाली आहे.
हेही वाचा : महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज बैठक, आघाडीत कोंडी होत असल्याची काँग्रेसची तक्रार