राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने आता राज्याच्या गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड (Kailash Gaikwad) यांना समन्स बजावलं आहे. चौकशीसाठी आजच ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना ईडीने दिल्या आहेत. त्यामुळे आता ईडीच्या चौकशीचा फेरा मंत्रलयातील बड्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या वसुलीचे आरोप केले. तसंच, पोलीस अधिकारी आणि प्रशासनातील बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा देखील आरोप करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर ईडीने गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना समन्स बजावलं आहे. कारण पोलीस अधिकारी आणि प्रशासनातील बदलाच्या आदेशावर कैलास गायकवाड यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निघायचे. त्यामुळे आज त्यांना ईडीने चौकशीसाठी ईडी कार्यलायत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
अनिल देशमुख नॉट रिचेबल
अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमीरा लागल्यापासून ते बेपत्ता आहेत. त्यांचा कुठेच ठावठिकाणा नाही आहे. ईडीने आत्तापर्यंत देशमुख यांना पाच वेळा चौकशीसाठी समन्स बजावले. मात्र, देशमुख अद्यापही हजर झालेले नाहीत. त्यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीसही बजावण्यात आली आहे.
अनिल देशमुख यांच्या शोधासाठी ईडीने आत्तापर्यंत १२ ते १४ वेळा त्यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले आहेत. ईडीची तीन पथकं एकाचवेळी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या शोधार्थ कार्यरत आहेत. असं असूनही अद्याप अनिल देशमुख ईडीसमोर आलेले नाहीत. त्याऐवजी त्यांनी न्यायालयात जाण्याचा मार्ग पत्करला आहे.
परमबीर सिंह फरार?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचारासह खंडणीप्रकरणी मुंबईसह ठाण्याच्या विविध पोलीस ठाण्यात तसंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हा दाखल असल्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. तसंच, चार दिवसांपूर्वी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीर सिंह यांच्या निलंबनाची शिफारस राज्याच्या गृहविभागाकडे दिली. त्यामुळे अटकेची टांगती तलवार आणि निलंबनाच्या कारवाीमुळे परमबीर सिंह परदेशात पळून गेल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.