जालना – एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप रविवारी जाहीर झाले. या खातेवाटपात मराठवाड्यातील आमदार आब्दुल सत्तार यांना कृषीमंत्री पद देण्यात आले. मंत्रिपद मिळताच अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मंत्रालयातील कामावरून टोला लगावला.
उद्धव ठाकरेंना टोला –
जालना जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाची जबाबदारी सत्तार यांना देण्यात आली होती. ध्वजारोहणानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अब्दुल सत्तार यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी सत्तार म्हणाले की, नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिवसातील १८-१८ तास काम करतात. मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात किती तास काम करायचे याची आपल्याला माहिती नाही, असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे.
ती मीडीया ट्रायल –
टीईटी घोटाळ्यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं आली होती. टीईटी घोटाळ्यात नाव असून सत्तार यांच्या मुलीला ९० हजार रुपये पगार असल्याचे समोर आले होते. त्यावर सत्तार म्हणाले की, टीईटी घोटाळा मीडिया ट्रायल होती. तो विषय आता संपलेला आहे.
नाना पटोलेंना उत्तर –
शिंदे-फडणवीस सरकारच्या खातेवाटपात भाजपाने स्वतःकडे महत्त्वाची खाती ठेवली आणि शिंदे गटाला केवळ झाडी, डोंगर दिल्याची खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. त्यानंतर आता पत्रकारांनी बंडखोर शिंदे गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. खातेवाटपाचे काम आम्ही खूप समन्वयाने केले आहे. भाजपा आणि शिवसेना युतीकडे विरोधक त्यांच्या डोळ्यात लागलेल्या चष्म्याप्रमाणे पाहत आहेत, असे मत सत्तारांनी व्यक्त केले.