कलानगर जंक्शन इथल्या वांद्रे सी-लिंक ते बीकेसी उड्डाणपुलाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तसंच मुंबईतल्या वाहतूकीच्या दृष्टीने विशेषत: कलानगर जंक्शनला होणाऱ्या ट्राफिकच्या दृष्टीने हा उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा असेल. सी-लिंक पासून थेट बीकेसीला हा उड्डाणपूल जोडला जाईल, त्यामुळे या परिसरात होणारी वाहतूकीची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि नागरिकांचा देखील त्रास कमी होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“मी या पूर्वी सुद्धा दुसऱ्या मार्गिकेचं लोकार्पण केलं होतं, त्याही वेळेला माझ्या भावना स्पष्ट केल्या होत्या. माझं बालपण या परिसरात गेलं आहे. गेली कित्येक वर्ष…६६ सालापासून आम्ही इथे राहतोय. माझ्या जुन्या आठवणी मी त्याही वेळेला बोललो असेन कदाचित…कलानगर पासून वांद्रे स्थानक…तेव्हा तो बेहरामपाड्याचा रस्ता देखील नव्हता. तेव्हा मी या रस्त्याने चालत जात होतो आणि रेल्वे रुळावरुन उतरुन प्लॅटफॉर्मवर जायचो. आज मला समाधान आहे. इथली वस्ती वाढली…बीकेसीमध्ये ट्राफिक वाढलं. त्या ट्राफिकला उत्तर म्हणून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून एकेक मार्ग स्वीकारत आहोत, त्याचं आज लोकापर्ण करत आहोत. मला खात्री आहे, या मार्गिकेमुळे कलानगर जंक्शनच्या परिसरात होणारी वाहतूक कोंडी होणार नाही,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
फडणवीसांना निमंत्रण नाही; दरेकरांनी कार्यक्रमावर टाकला बहिष्कार
कलानगर पुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना देण्यात आलं मात्र, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण न दिल्यामुळे दरेकरांनीही कार्यक्रमावर टाकला बहिष्कार टाकला. यासंदर्भात दरेकर यांनी MMRDA चे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये एका विरोधी पक्षनेत्याचं नाव टाकायचं आणि दुसऱ्याचं नाही टाकायचं हे राजशिष्टाचाराला धरुन नाही असं म्हटलं आहे.