नाशिक – नियोजन समितीच्या निधीवरून पालकमंत्री छगन भुजबळ विरूध्द सुहास कांदे असा वाद पेटला होता. त्यातच आता नाशिक दौर्यावर आलेल्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भुजबळांनी नांदगावचा नाद सोडावा, असा टोला लगावला. याबाबत भुजबळांना विचारले असता त्यांनी कांदेंविषयी विचारू नका, कांद्याबाबत बोला, असे सांगत याविषयी बोलण्यास नकार दिला.
नियोजन समितीच्या निधी वाटपात नांदगाव मतदारसंघावर अन्याय झाल्याचा आरोप करत हा निधी भुजबळांनी परस्पर वाटप केल्याचा आरोप नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी केला. यामुळे नांदगाव मतदारसंघ राज्यात चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना नाशिकमध्ये मात्र सेना, राष्ट्रवादीत म्हणजेच भुजबळ विरूध्द कांदे असा सामना रंगला. त्यामुळे जिल्ह्यात आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आले. दरम्यान, नाशिक दौर्यावर आलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत या वादात मध्यस्थी करतील, अशी अपेक्षा असताना खासदार राऊत यांनी कांदे यांची पाठराखण करत, भुजबळांनी नांदगावचा नाद सोडावा, उद्या नांदगावला लाल दिवा आणू, असे सांगत भुजबळांना टोला लगावला.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री भुजबळ यांना राऊत यांच्या या वक्तव्याबाबत विचारले असता, भुजबळांनी पत्रकार परिषद संपली असे जाहीर करत याविषयी अधिक बोलण्यास नकार दिला. लगेचच एका पत्रकार म्हणाला, साहेब, कांदेंविषयी नाही निदान कांद्याविषयी तर बोला. तेव्हा कुठे साहेब बोलण्यास तयार झाले. आयकर विभागाची सूत्रे ही राज्यातून नव्हे तर दिल्लीतून फिरतात. त्यामुळे ते केव्हा आले, केव्हा गेले याची माहितीही मिळत नाही. छाप्यांमुळे व्यापारी चार पाऊले मागे जातात आणि त्यामुळे नाहक शेतकर्यांचे नुकसान होते, असेही त्यांनी सांगितले.