राज्यातील नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सर्वाधिक जागा आल्या आहेत. संख्याबळामध्ये भाजप महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना असा क्रम आहे. महाविकास आघाडीच्या जागा जास्त आल्या असल्या तरी एकट्या भाजपने नगरपंचायत निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे. भाजपला गेल्यावेळीपेक्षा अधिक जागा मिळाल्याचे पाहून तुमची नशा उतरली असेल असा टोला भाजपने महाविकास आघाडीला लगावला आहे. भाजपला प्रत्येक ठिकाणी सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग करु असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
राज्यातील जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. या निकालानुसार भाजप महाराष्ट्रातील एक नंबरचा पक्ष ठरला आहे. जनतेनं भाजपला चांगला प्रतिसाद दिला असून महाविकास आघाडीवर जनता नाराज असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. परंतु भाजपपेक्षा महाविकास आघाडीच्या जास्त जागा आल्या असल्याचा दावा मविआ नेत्यांकडून करण्यात येत आहे. परंतु जनता आणि भाजपा यांचे गणित पक्के असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर अकाऊंटवर महाविकास आघाडीला टोला लगावण्यात आला आहे. जनता आणि भाजपा यांचे गणित पक्के आहे. तिघांच्याही जोर‘वसुली’मुळे बेरजेची गरज तुम्हालाच अधिक, असेल हिंमत तर एकदा छातीठोकपणे सांगा की, या निवडणुका तुम्ही तिघांनी एकत्रितरित्या लढविल्या. तसेही भाजपाला गेल्यावेळीपेक्षा अधिक जागा मिळाल्याने तुमची नशा उतरली असेलच असा खोचक टोला भाजपकडून लगावण्यात आला आहे.
जनता आणि भाजपा यांचे गणित पक्के आहे!
तिघांच्याही जोर‘वसुली’मुळे बेरजेची गरज तुम्हालाच अधिक!
असेल हिंमत तर एकदा छातीठोकपणे सांगा की, या निवडणुका तुम्ही तिघांनी एकत्रितरित्या लढविल्या. तसेही भाजपाला गेल्यावेळीपेक्षा अधिक जागा मिळाल्याने तुमची नशा उतरली असेलच. https://t.co/KJVrHJ4exR— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 20, 2022
राज्यात भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष
राज्यातील नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ३८४ जागा मिळवून पहिला क्रमांकावर मजल मारली आहे. दुसऱ्या स्थानावर राष्ट्रवादीला ३४४ जागा मिळाल्या आहेत. राज्यात आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसून २८४ जागा जिंकत हा पक्ष चौथ्या स्थानी फेकला गेला आहे. तर ३१६ जागा जिंकत काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.
हेही वाचा : ‘विदर्भात पक्ष चौथ्या नंबरवर’ प्रमुख नेत्यांनी आत्मचिंतन करावं, आमदाराचा शिवसेनेला घरचा आहेर