घरताज्या घडामोडीसत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

Subscribe

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे. जे. पी. नड्डा यांनी न्यू इंग्लिश हायस्कूलच्या क्रीडांगणावर ‘विजय संकल्प’ जाहीर सभेच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी ते चंद्रपूरमध्ये बोलत होते.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी भ्रष्टाचाराची तीन दुकाने उघडली. सत्तेसाठी विचारांशी तडजोड करणाऱ्या अशा लोकांना माफी नाही. राजकारणात सत्याचा नेहमीच विजय होतो. वीरता, शौर्यासाठी ओळखला जाणाऱ्या महाराष्ट्राने बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी डावलून उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी महाविकास आघाडीची हातमिळवणी करत पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका जे. पी. नड्डा यांनी ठाकरेंवर केली.

- Advertisement -

अनैसर्गिक आघाडी जास्त दिवस टीकत नाही. विचारधारेला तिलांजली देत उद्धव ठाकरेंनी हिंदू सणांवर बंदी घातली. महाविकास आघाडीचा जॉइंटली एॅक्वायरिंग मनी असा धंदा सुरू होता. भ्रष्टाचारामुळे राज्यातील दोन मंत्री कारागृहात गेले. त्यातील एक माजी मंत्री नुकतेच कारागृहातून सुटून बाहेर आले तर एक कारागृहात अजूनही शिक्षा भोगत आहेत, असं म्हणत नड्डांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. डिलरशिप, ब्रोकेज आणि ट्रान्सफर हेच ते करीत होते. तर आमचे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असे आहे, असं नड्डा म्हणाले.

नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या डबल इंजिनाने 3 लाख 75 हजार कोटींची विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणली.
व्हायब्रंट गुजरातप्रमाणे ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ योजना आणली आहे. भाजपाने देश, प्रदेश आणि गावपातळीवर विकासाची कथा कमळ चिन्हावर लिहिली. हा विजयी रथ चंद्रपूरच्या जनतेला समोर घेऊन जायचा आहे, असंही नड्डा म्हणाले.

- Advertisement -

जे पी नड्डा आज चंद्रपूर आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रपूरनंतर ते येत्या 10 जानेवारीला पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यातून नड्डा यांनी आगामी काळात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी ‘मिशन-144’सुरु केलंय. भाजपच्या या मिशनमुळे शिंदे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिशन-144 अंतर्गत भाजपने महाराष्ट्रातील 16 मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये चंद्रपूर, हिंगोली, बुलडाणा, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.


हेही वाचा : ‘त्या’ जमिनीच्या तपासासाठी अधिकारी मुक्ताईनगरमध्ये दाखल, एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -