मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून नाशिकमध्ये उभारण्यात आलेल्या प्रकल्पांची मनसे नेते अमित ठाकरे यांनी पाहणी केली. त्यातील अनेक प्रकल्पांची अत्यंत दुरवस्था झालेली आढळून आली. या दुरवस्थेला महापालिकेतील सत्ताधारी भाजपच जबाबदार असल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला. राजकारण बाजूला ठेवून या प्रकल्पांची सुधारणा करावी, अशी मागणीही देशपांडे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांसाठी खोदलेले खड्डे तातडीने बुजवले नाहीत तर त्याच खड्ड्यांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना बसवू, असा इशाराही देशपांडे यांनी दिला. मनसेच्या कामांवर भाजप आपली पोळी भाजते आहे, अशी टीका करतानाच कामगारांना कोविड भत्ता मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे नाशिक महापालिका निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री कोयनाला पोहोचत नाहीत, दिल्लीत काय पोहोचणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचं नेतृत्व करावे, असे संजय राऊत म्हणतात. राऊत काहीही बोलतात, त्यात फारकाही गांभीर्य नसतं, असा टोलाही देशपांडे यांनी लगावला. मुख्यमंत्री कोयनाला पोहोचत नाहीत, तर दिल्लीत काय पोहोचतील, असा सवालही त्यांनी केला.