मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला अपशकून करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला असल्याची टीका त्यांनी मिलिंद देवरा यांच्यावर केली आहे.
हेही वाचा – Milind Deora यांच्या राजीनाम्यावर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया, म्हणाले – “काँग्रेसने…”
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज, रविवारी हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्याय यासारख्या मुद्द्यांवर नागरिकांचे लक्ष केंद्रित करण्याचा पक्षाचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जात आहे. मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातून सुरू होणारी भारत जोडो न्याय यात्रा 15 राज्यांतून जाणार असून याद्वारे लोकसभेच्या 100 जागांचे लक्ष्य काँग्रेसने ठेवले आहे. पक्षाने सुरुवातीला इम्फाळ येथून प्रवास सुरू करण्याचे नियोजित केले होते, परंतु त्यासाठी मंजुरी मिळाली नाही.
आमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे.
देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शोषीत,…
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 14, 2024
या पार्श्वभूमीवर काँग्रेसेच माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून (X) याची माहिती दिली आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मिलिंद देवरा यांनी केले आहे. मात्र, आता या जागेवर ठाकरे गटाने दावा केला आहे. ठाकरे गटाची ही पारंपरिक जागा असून विद्यमान खासदार अरविंद सावंत हेच येथील उमेदवार असतील, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. याच कारणास्तव मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
हेही वाचा – “हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष काढा…”, Sanjay Raut यांचे CM Eknath Shinde यांना आव्हान
यावरून राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करत देवरा यांच्या या निर्णयाबद्दल नापसंती व्यक्त केली आहे. आमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शोषित, पीडित जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी 6 हजार 700 किलोमीटरची यात्रा काढणाऱ्या राहुल गांधी यांच्या मार्गात अडथळे आणण्याचा आपला हा प्रयत्न आपले वडील, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते दिवंगत मुरली देवरा यांनाही आवडला नसेल, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.