कोरोनाची लस उत्पादनासंबंधीत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणी केली होती. आता केंद्राला प्रस्ताव देऊ. ज्या कंपन्या आहेत, त्यांच्याशी बोलणं सुरु आहे. ते सर्व सुरळीत झालं तर येत्या काही दिवसांमध्ये आपण किमान फिल आणि फिनिश स्वरुपात म्हणजेच बल्कमध्ये लसीचा पुरवठा करु, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या पाफकीन इन्स्टिट्यूटला भेट दिली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली.
लसीच्या उत्पादनासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत, त्याची पूर्तता करु, असं मुख्यमंत्री म्हणाले. लस बनवणाऱ्या इतर ज्या कंपन्या आहेत. त्यांच्याशी बोलणी सुरु आहे. तसंच राज्यातील मान्यताप्राप्त संस्थेत सातत्याने संशोधन सुरु राहील, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मला कोरोना लसीबाबत राजकारण करायचं नाही आहे. केंद्र सरकारनं सांगितलं आहे की, तुम्हाला मागणीनुसार पुरवठा केला जाईल. त्यांनी वर्गवारी करुन दिलेली आहे. ती वर्गवारी योग्य आहे. पण या संकटातून लवकर बाहेर पडण्यासाठी लसींचा पुरवठा वाढवावा लागेल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची हाफकीन संस्थेस भेट व पाहणी तसेच अधिकाऱ्यांसमवेत बैठक.
CM Uddhav Balasaheb Thackeray at the Haffkine Institute. Meeting with the officials is underway. pic.twitter.com/5LhohiMtO9
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 20, 2021
लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याचं स्पष्ट दिसत आहे. अशावेळी नागरिकांनी सरकारने घालून दिलेले नियम पाळणं गरजेचं आहे. भाजी मंडई किंवा अन्य ठिकाणी होणारी गर्दी टाळली पाहिजे. रुग्णसंख्या वाढतच गेली तर लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल, असं स्पष्ट संकेतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात रुग्णसंख्या कमी झाली नाही तर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.