बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आम्हाला पक्षातील घाण म्हटले आहे. आम्ही घाण आहोत का? कालपर्यंत तुम्ही आमच्यासोबत एकाच गाडीत बसून फिरत होतात. आज आम्ही तुम्हाला घाण वाटतो का? आम्हाला नागरिकांनी निवडून दिलं म्हणून तुम्ही सत्तेत आला आहात, असं म्हणत दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
दीपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, आमच्याबाबत वाटेल ते अपशब्द वापरले जात आहेत. आमच्या कुटुंबातील व्यक्तींबाबत काहीही बोलत आहात. बायका आणि मुलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली जात आहे. हे बरोबर नसून ही बाळासाहेबांची शिकवण नाहीये. तसेच इतक्या खालच्या तापळीवर बोलण्याची काहीही गरज नाही, असं केसरकर म्हणाले.
आम्ही शिवसेनेच्या भल्यासाठी बंड पुकारला आहे. यामध्ये शिवसेनेचंच भलं होणार आहे. महाविकास आघाडीसोबत राहून काहीही साध्य होणार नाहीये. सल्ले देणारे अनेकजण आहेत. परंतु आम्ही आमचं ऐकतो. या बंडातून शिवसेनेला पुन्हा एकदा ताकद देणारे सरकार महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले आहे.
कोणासोबत सरकार स्थापन करायचे याचा निर्णय आमचे नेते एकनाथ शिंदे घेतील. आम्ही त्यांच्यावर सर्वकाही सोपवलं आहे, असेही दीपक केसरकर म्हणाले.
हेही वाचा : शिंदे गटात येण्यासाठी तब्बल ५० कोटींची ऑफर, शिवसेना आमदाराचा मोठा खुलासा