मुंबई : राज्यात 2019 साली झालेल्या निवडणुकीनंतर भाजपाच्या सध्याच्या दिल्लीश्वरांनी बेइमानी केल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात करण्यात आला आहे. त्यावर महाराष्ट्र भाजपाच्या महिला आघाडीप्रमुख चित्रा वाघ यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
ओ सर्वज्ञानी….रडत राऊत ! @rautsanjay61
पक्षाने दिलेली जबाबदारी शिरसावंद्य मानून स्वीकारणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी @Dev_Fadnavis यांनी आपल्या या कृतीने राजकारणात आदर्श निर्माण केलाय. ते सर्वांच्या आदरास पात्र ठरलेत.
दुसरीकडे तुम्ही आणि तुमचा पट्टा ज्यांच्या हातात…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 19, 2023
मी येणारच होतो, पण काही लोकांनी बेइमानी केली म्हणून मध्येच लटकलो, पण तरीही आलो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल, शुक्रवारी म्हटले होते. आता 2019 साली बेइमानी कोणी केली, हे महाराष्ट्र जाणतो. बेइमानी केली ती भाजपाच्या सध्याच्या दिल्लीश्वरांनी. सत्तेचे वाटप समसमान करण्याचा शब्द देऊन तो फिरवण्यात आला व फडणवीस हे त्याचे साक्षीदार आहेत, याचा पुनरुच्चार ठाकरे गटाने सामनातील अग्रलेखात केला आहे. तसेच, ‘‘मी पुन्हा येईन, असे म्हणालो होतो. बोलल्याप्रमाणे तसेच झालेही होते, परंतु काही लोकांनी गद्दारी केली तरीही मी आलोच,’’ असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुनः पुन्हा, पुनः पुन्हा सांगितले आहे. ही त्यांची अर्धग्लानी अवस्था आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर शरसंधान केले आहे.
हेही वाचा – आता काय सत्यनारायणाची पूजा सांगत आहेत? अजित पवारांवरून ठाकरे गटाची फडणवीसांवर टीका
त्यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी शिरसावंद्य मानून स्वीकारणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या या कृतीने राजकारणात आदर्श निर्माण केलाय. ते सर्वांच्या आदरास पात्र ठरले आहेत. दुसरीकडे तुम्ही (संजय राऊत) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र जनतेच्या मनातून पार उतरला आहात. तुरूंगाची नशा तुमच्यात इतकी भिनलेली दिसते की, बोलण्यात ताळतंत्र राहिलेला नाही. तुम्ही इतरांच्या ग्लानीची उठाठेव करू नका. देवेंद्र फडणवीस यांनी आपले ‘उप’मुख्यमंत्रीपदही जनतेच्या कल्याणासाठी वाहिले आहे, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे टीकास्त्र
तुमचे ‘चूप’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र घरातूनच राज्याचा कारभार हाकत, महाराष्ट्राच्या प्रश्नांवर मूग गिळून गप्प बसले होते. हाल-अपेष्टा भोगणाऱ्या जनतेच्या आसवांकडे दुर्लक्ष करणारे उद्धव ठाकरे तेव्हा कोणते ‘आसव’ घेऊन राज्य चालवीत होते, हेही एकदा सांगूनच टाका. तुमची पातळीहीन शब्दधुंदी नेमक्या कुठल्या पेयाच्या प्रभावामुळे आहे, हेही जनतेला कळू द्या, असे त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना सुनावले आहे.