बंडखोर आमदारांचा शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. शिंदेच्या या याचिकेवर आजा सुनावणी झाली असून, न्यायालयाने शिंदे गटाला दिलासा दिला. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा विजय असल्याचे म्हटले आहे. (Eknath Shinde Suprem court Hindutva Balasaheb Thackeray Dharmaveer Anand Dighe victory)
एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत “हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..”, असे म्हटले. थेट संवाद न साधता बंडानंतर एकनाथ शिंदे ट्विटरच्या माध्यमातून आपली मते मांडत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रत्येक ट्विटमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आहे.
हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!#realshivsenawins
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 27, 2022
हेही वाचा – शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, पुढील सुनावणी होणार ११ जुलैला
सध्यस्थितीत अटी-तटीची लढाई सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूने सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर विधानसभा उपाध्यक्षांना शिंदे गटाच्या आमदारांवर तूर्तास तरी अपात्रतेची कारवाई करता येणार नाही, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या अपात्रतेच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी मुदतवाढ दिली. त्यानुसार, या याचिकेवरील पुढील सुनावणी आता ११ जुलै रोजी होणार आहे. तर, नोटीस बजावलेल्या या १६ बंडखोर आमदारांना १२ जुलैपर्यंत उत्तर देता येणार आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना नोटीस बजावली आहे. या प्रतिवाद्यांना पुढील पाच दिवसांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा – बंडखोर आमदारांना डोळ्यात डोळे घालून बोलावेच लागणार; आदित्य ठाकरेंचा इशारा