शरद पवार संरक्षणमंत्री असतानाच्या कार्याकाळावर उर्जामंत्री नितीन राऊतांनी टीका केली आहे. काही चुका दुरुस्त केल्या असत्या तर बरं झालं असतं, असा टोला उर्जामंत्री नितीन राऊतांनी लगावला आहे. शरद पवारांनी भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वक्तव्य काँग्रेसच्या पचनी पडलेलं दिसत नाही आहे. राहुल गांधी जे बोलले ते देशाला एकसंघ ठेवण्यासाठी बोलले होते, असं नितीन राऊत म्हणाले.
गलवान खोऱ्यात काय झालं हे देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुल गांधींनी सल्ला दिला असेल तर काही वाईट नाही. शरद पवार हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. ते चुकून बोलले असतील, असं नितीन राऊत म्हणाले. शरद पवार स्वत: संरक्षणमंत्री होते. मागे काही चुका झाल्या असतील तर त्या सोडवण्याची संधी त्यांना होती, अशी आठवणही नितीन राऊत यांनी करुन दिली.
भारत-चीन दरम्यान झालेल्या संघर्षावरून केंद्र सरकारवर काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे कान टोचले होते. राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आरोप करताना पूर्वी काय घडलं होतं, याचाही विचार केला पाहिजे. १९६२च्या युद्धानंतर चीनने भारताचा ४५ हजार किलोमीटरचा भूभाग बळकावला होता. तो आजही परत मिळालेला नाही, अशी आठवण करून देतानाच राष्ट्राच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करू नका, अशा शब्दांत शरद पवार यांनी राहुल गांधी यांचे कान टोचले होते.
हेही वाचा – वर्क फ्रॉम होममुळे वीज बिल वाढलं – उर्जामंत्री नितीन राऊत