घरमहाराष्ट्रगृहमंत्री देशमुख यांची हकालपट्टी करा

गृहमंत्री देशमुख यांची हकालपट्टी करा

Subscribe

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने दोन साधूंची जमावाकडून हत्या झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक आहे. राज्यात वारंवार कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली.

पालघरच्या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही पाटील यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

- Advertisement -

पालघरच्या घटनेची मुख्यमंत्र्यांना सरकारी यंत्रणेकडून तातडीने माहिती मिळाली असेलच. तथापि, याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः विचारणा केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवला आणि सोशल मीडियावरून या प्रकरणी सरकारची नाचक्की झाली. त्यानंतर मुख्यमंत्री राज्यातील जनतेशी बोलले. या गंभीर घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने स्वतः जनतेशी संवाद साधायला हवा होता. तरीही त्यांनी चार दिवस वेळ लावला, याबद्दल पाटील यांनी खेद व्यक्त केला.

राज्यात गेल्या काही दिवसात गंभीर घटना घडल्या आहेत. ठाण्यात एका तरुणाला एका मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन मारहाण करण्यात आली. हजारो कोटींच्या गैरव्यवहारात तपास यंत्रणांना हवा असलेल्या आरोपीला राज्याच्या गृहखात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍याकडून लॉकडाऊनच्या काळात सवलत देण्यासाठी पत्र देण्यात आले. लॉकडाऊनमुळे संचारबंदी असताना मुंबईत वांद्रे येथे हजारोंचा जमाव जमला. आता पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने साधूंचे हत्याकांड झाले. त्यामुळे या घटनांबद्दल मुख्यमंत्र्यानी अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -