कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे लसींचे दोन्ही डोस घेतल्यास कोरोनाच्या नव्या व्हेरियंटपासून संरक्षण करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लसींचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. याचपार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारकडून राज्य सरकार आणि राज्य सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यांतील लसीकरण यंत्रणांना दुसऱ्या डोस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या अशी सुचना केल्या आहेत. त्यानुसार आता जिल्ह्यात किती नागरिकांचे कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेणे बाकी आहे याची माहिती लसीकरण यंत्रणेला दिली जाणार आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांना लस घेतल्याशिवाय परतावे लागत आहेत. त्यामुळे लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल सुरु आहे. त्यामुळे मुंबई, नाशिक, ठाणे, डोंबिवली लसीकरण केंद्रांबाहेर लस घेण्यासाठी पहाटे तीन वाजल्यापासूनच रांगा लावून उभे राहत आहे. असे असतानाही मर्यादित लसींच्या साठ्यामुळे शेकडो नागरिकांना खाली हाती जाण्याशिवाय पर्याय उरत नाही.
यातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अपर सचिव डॉ. मनोहर अगनानी यांनी पत्राच्या माध्यमातून राज्य सरकाराला दुसऱ्या डोसचे प्रमाण वाढवण्याच्या सुचना केल्या आहेत. सध्या पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मात्र लसींच्य तुटवड्यामुळे अनेकांच्या दुसऱ्या डोसचा कालावधी लांबला आहे. असे असतानाही सर्व जिल्ह्यांमधील लसीकरण यंत्रणांनी दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य द्यावे असे पत्रात नमूद केले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ८०-९० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय कोरोनाची तिसरी लाट रोखणे अशक्य आहे. सध्या लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे लसीकरण प्रक्रिया जलद करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या जात आहेत.
मुंबईकरांवर ओढवणार पाणी कपातीचे संकट