राज्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येचा वाढता वेग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नव्याने कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. उद्यापासून राज्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू होणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवेशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. राज्यातील महाविद्यालये आणि शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. या अनुषंगाने काल, शनिवारी भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिले.
राज्यातील कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल
आरोग्यमंत्री राजेश टोपे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘सध्या ऑक्सिजनची अधिक मागणी नाही आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असले तरी त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे असून गंभीर लक्षणे नाहीत. राज्यात निर्बंध अतिशय मोठ्या प्रमाणात लावले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल. जर ऑक्सिजनची मागणी वाढली आणि बेड्सचा वापर अधिक वाढला तर यापेक्षा अधिक मोठे निर्बंध लावण्याबाबत विचार केला जाईल.’
राज्यातील दारू, वाईन शॉप बंद होणार का?
काल सदाभाऊ खोत म्हणाले की, शाळा बंद आणि बार सुरू म्हणजे या महाभकास आघाडी सरकारला “क्लास पेक्षा ग्लास” महत्त्वाचा वाटतो. वाह रे वाह ठाकरे सरकार. याबाबत राजेश टोपे म्हणाले की, गर्दी होत असलेल्या सर्वच ठिकाणी आपल्याला निर्बंध आणायचे आहेत. मग दारू, वॉईग शॉपवर गर्दी होत असेल तर त्याच्यावर निर्बंध आणण्यात काहीच अडचण नाही.’
हेही वाचा – Corona Strict Restriction : राज्य सरकारकडून मिनी लॉकडाऊनची घोषणा, नेमके नियम कोणते? जाणून घ्या