औरंगाबाद – राज्यात ऑनर किलिंगच्या (Honor Killing) घटना दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. नुकतीच औरंगाबाद जिल्ह्यात अशी घटना घडली आहे. तीन वर्षांपूर्वी बहिणीने पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या तरुणाची भरस्त्यात हत्या करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर तरुणाची हत्या केल्यानंतर आरोपीने तिथेच जल्लोष केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. बापू खिल्लारे (३०) असं मृत तरुणाचं नाव आहे.
औरंगाबाद-पुणे महामार्गावर ही घटना घडली आहे. तीन वर्षांपूर्वी आरोपीच्या बहिणीला पळवून विवाह केला होता. याचा राग मनात धरून भावाने आपल्या बहिणीच्या पतीचीच हत्या केली आहे. आरोपीने तरुणावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. त्यामुळे तरुण जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. तरुणाचा जीव गेल्याचे लक्षात येताच आरोपीने त्याच्या मृतदेहाजवळच जल्लोष केला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली. त्याला पकडायच्या आतच तो मोटारसायकलीवरून फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला आहे.
आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना झाली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
हेही वाचा – जालन्यात ऑनर किलिंग! पळून जाऊन लग्न केल्यामुळे बापानं केली मुलीची हत्या
जालन्यातही ऑनर किलिंग
काही दिवसांपूर्वी जालन्यातही ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली होती. मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने तिच्या बापानं तिची हत्या केली. क्रूर बापाने मुलीला गळफास दिला आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवात लावण्यासाठी तिचा मृतदेह जाळून टाकला. ही घटना जालना तालुक्यातील पिरपिंपळगावमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यकला संतोष सरोदे असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. सूर्यकला ही तिच्या नात्यातील मुलासोबत पळून गेली होती. लग्न करून देतो असे सांगून तिच्या वडिलांनी तिला परत बोलावले. तीन दिवसांनंतर मुलगी घरी परतली. तिच्या लग्नाची सर्व तयारी आजूबाजूच्या मर्यादित नातेवाईकांसह केली गेली होती. मात्र, लग्नापूर्वी तिचे वडील संतोष सरोदे आणि काका नामदेव सरोदे यांनी तिला मंडपातून घराजवळील झाडावर ओढून नेले. त्यानंतर त्यांनी तिच्या गळ्याला दोरी बांधून तिला झाडाला लटकवले. तसेच तिच्या मृतदेहाची विल्हेवात लावण्यासाठी तीचा मृतदेह जाळून टाकला.