निसर्ग चक्रिवादळ आज महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणार आहे. या चक्रीवादळाचा परिणाम रेल्वे आणि हवाई प्रवासावरही झाला आहे. मध्य रेल्वेने मुंबईकडून धावणाऱ्या अनेक गाड्यांचं वेळापत्रक बदललं आहे. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणार्या ५ गाड्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आलं आहे, तर मुंबई टर्मिनसला जाणाऱ्या दोन गाड्यांचे नियमन केलं जाईल आणि एक रेल्वे वळवण्यात आली आहे.
Due to #NisargaCyclone likely to hit Mumbai area on 3.6.2020, the train running pattern will be as under ? pic.twitter.com/NIB4rXNfId
— Central Railway (@Central_Railway) June 2, 2020
रेल्वेशिवाय चक्रीवादळाचा हवाई प्रवासावरही परिणाम झाला आहे. निसर्ग चक्रिवादळामुळे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता इंडिगो एअरलाइन्सने मुंबई विमानतळावरुन ये-जा करणारी १७ उड्डाणे रद्द केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी म्हणजेच आज सकाळी ११ विमानं मुंबई विमानतळावरून उड्डाण करतील. त्याचबरोबर येथे ८ विमानं लँडिंग करणार आहेत. ही उड्डाणे एअर एशिया इंडिया, एअर इंडिया, इंडिगो, गो-एयर आणि स्पाइसजेट या विमान कंपन्यांची आहेत.
वादळाचा धोका लक्षात घेता इंडिगो एअरलाइन्सने यापूर्वीच १७ उड्डाणे रद्द केली आहेत. आज मुंबईहून इंडिगो एअरलाइन्सची केवळ ३ विमान उड्डाण करणार आहेत. ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता मुंबईतील समुद्रकिनार्यावर फिरण्यास लोकांना मनाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली. कलम १४४ अन्वये आदेश जारी करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचा – ‘निसर्ग’ चक्रिवादळ आज धडकणार; मुंबईपासून अवघ्या २०० कि.मी. अंतरावर
वेस्टर्न नेवल कमांडने निसर्ग चक्रीवादळामुळे होणार्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व तुकड्यांना सतर्क केलं आहे. संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, नौदलाने मुंबईत पाच पूर आणि तीन गोताखोरांची टीम तयार ठेवली आहे. गुजरातमध्ये किनारपट्टी भागातून ७८,००० लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. येथे एनडीआरएफच्या १३ आणि एसडीआरएफच्या ६ तुकड्या विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती यांच्या अडचणी वाढल्या; ईडीने दाखल केलं आरोपपत्र