राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा राजकीय वाद उफाळून आला आहे. यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनासह अनेक संघटनांनी निषेध व्यक्त केला, तर अनेकांनी कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरून हकालपट्टी करा अशी मागणी केली. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच आदर्श आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची चांगलीच माहिती आहे. त्यांनी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. असं फडणवीस यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र पोलिस दलातर्फे रामटेकडी येथील राज्य राखीव पोलिस बल येथे ‘अखिल भारतीय पोलिस रेसलिंग क्लस्टर स्पर्धा २०२२’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचेच आदर्श आहेत. तेच आमचे हिरो आहेत. महाराजांसारखा दुसरा आदर्श नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आणि त्यांच्या शौर्याची माहिती देशातील सर्वांना आहे. राज्यपाल कोश्यारी यांना देखील त्याची चांगली माहिती आहे. राज्यपालांच्या मनात काही शंका नाही, मात्र त्यांच्या विधानाचा विपर्यास करून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. धांशू त्रिवेदी यांनीही महाराजांबाबत चुकीचे वक्तव्य केलेले नाही. असं फडणवीस म्हणाले.
यावेळी पोलिस दलातील बदल्यांवर फडणवीस म्हणाले की, जे पोलिस अधिकारी बदलीस पात्र आहेत, त्यांच्याच बदल्या करण्यात आल्या आहेत.उर्वरीत अधिकाऱ्यांच्या बदल्या अद्याप झालेल्या नाहीत. सर्व बदल्या नियमानुसारच केलेल्या आहेत. असं त्यांनी स्पष्ट केले.