राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने दमदार बॅडिंग केली. विविध भागातील नदी, तलाव, धरणं ओव्हर फ्लो झालीत. तर शेती कामांसाठी देखील चांगले वातावरण निर्माण झाले आहे. यंदा चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी देखील दिलासा व्यक्त केला आहे. मात्र काही ठिकाणी प्रमाणपेक्षा जास्त पावसाने शेती पिकांचे नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर काही ठिकाणी नदी नाल्यांतील पूरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र गेल्या ३- ४ दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कमी होत आहे. विविध जिल्ह्यातील पूरस्थिती ओसरण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे ठिकठिकाणच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळतोय. पावसाचा जोर ओसरल्याने शेतीच्या काम वेगाने सुरु झाली आहेत.
हेही वाचा : मुंबई आणि ठाणेकरांसाठी निर्णयांचा पाऊस
नाशिकमध्ये पूरस्थिती ‘जैसे थे’
नाशिक जिल्ह्यात आजही अनेक भागात पूर स्थिती जैसे थे आहे. मात्र अनेक भागात नदीवरील पूल पावसामुळे वाहून गेल्याने नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. सुरगाणा तालुक्यातील सावरपाडामधील केटी बंधाऱ्यावरून पुराचे पाणी जास्त असल्याने नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून वाट काढत जीवघेणा प्रवास करावा लागतोय. तर जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ आदिवासी भागात असुविधांमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय.
हेही वाचा : अहमदनगर जिल्ह्यात पुरे‘पूर‘ पाऊस
कोल्हापूरकरांनी दिलासा
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली असल्याने मोठा दिलासा मिळत आहे. पावसाच्या विश्रांतीमुळे शेती कामांना वेग आला आहे. ज्यामुळे बळीराजा सुखावला आहे. कोल्हापूरातील जवळपास 16 बंधाऱ्यांवरील पाण्याची पातळी ओसरल्याने वाहतूक पूर्वपदावर येत आहे. जिल्ह्यातील 15 बंधारे अद्याप पाण्याखाली असले तरी पाणी पातळी स्थिर आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांवरील पाणी ओसरत असल्याचे दिसत आहे.
कोल्हापूरातील प्रमुख धरणांमध्य निम्म्याहून अधिक पाणीसाठा झाला असला तरी ते पूर्णपणे भरले नाहीत. दरम्यान यंदा पाटबंधारे विभागाने पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने केल्याने पूरस्थिती निर्माण झाली नाही.
हेही वाचा : आता मुंबईची तुंबई होणार नाही! 306 ठिकाणी पालिकेच्या यशस्वी उपाययोजना
हिंगोलीतही पावसाची दमदार हजेरी
हिंगोलतही अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे औंढा नागनाथ तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तर अनेक नद्या, ओढे, तुटुंब भरून वाहत आहेत. याशिवाय वगनवाडी, तांडा भागातही शेती तलावाच्या सिंचनाखाली गेली आहे.
बुलढाण्यात पावसाचा धुमाकूळ
बुलढाणा जिल्ह्यातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. मात्र कालपासून पावसाचा जोर ओसरल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसतेय तर काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.