राज्यातील विधानपरिषदेवरील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवार दुपारी ३.३० वाजेपर्यंत शेवटची मुदत होती. शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. कोल्हापूरचे भाजप उमेदवार अमल महाडिक यांनी अर्ज मागे घेतला आहे. तर नागपूरमध्ये निवडणूक होणार आहे. काँग्रेसकडून नागपूरमध्ये छोटू भोयर हे उमेदवारी लढवणार असून ते विजयी होतील असे वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलं आहे. धुळे-नंदुरबार आणि कोल्हापूरच्या जागांवर विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. नागूपरच्या जागेबाबत कोणताही प्रस्ताव आला नसल्यामुळे कोणतीच चर्चा झाली नाही अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना निवडणुकांबाबत माहिती दिली आहे. यावेळी नाना पटोले म्हणाले की, विधानपरिषदेच्या २ जागा शुक्रवारी बिनविरोध झाल्या आहेत. यातील एक धुळे नंदूरबारची जागा भाजपला तर कोल्हापूरची जागा काँग्रेसला भेटली आहे. मुंबईत एक शिवसेना आणि एक भाजप अशी प्रकारची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
नागपूरमध्ये लढत होणार असून याची सुरुवात झाली आहे. या लढतीमध्ये काँग्रेसचा विजय होणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया संपली आहे. काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर हे विजयी होतील असेही त्यांनी सांगितले आहे. नागपूरच्या जागेबाबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे त्या जागेबाबत चर्चा झाली नाही असेही नाना पटोले यांनी सांगितले आहे.
काँग्रेसचा नारायण राणेंवर पलटवार
मार्च महिन्यात भाजपचे महाराष्ट्रात सरकार येईल असे वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. असा प्रश्न नारायण राणे यांनी केला होता. यावर नाना पटोले म्हणाले की, भविष्यवाणी करणारे भाजप हा पक्ष आहे. आता त्यांची भविष्यवाणी खोटी निघायला लागली आहे. आता त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. त्यामुळे त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ राहिला नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्षे चालेल आणि महाराष्ट्राला विकासाच्या व्यवस्थेमध्ये आणेल असा पलटवार नाना पटोले यांनी केलं आहे.
हेही वाचा : MLC election: आमच ठरल्यानुसार घडलंयं ! अमल महाडिकांचा अर्ज मागे, सतेज पाटलांचा मार्ग मोकळा