नाशिक ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच आजादी का अमृत महोत्सवनिमित्त पर्यावरण संवर्धनासाठी नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेली नाशिक ते मुंबई नेट झिरो इंडिया सायकल मोहीम शुक्रवारी सायंकाळी गेटवे ऑफ इंडिया येथे पोहचली. शनिवारी सकाळी सात वाजता गेटवे ऑफ इंडिया येथून नेट झिरो इंडिया या सायकल मोहिमेचा प्रारंभ झाला. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे संस्थापक सदस्य पर्यावरण प्रेमी किरण चव्हाण यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या सायकल प्रबोधन राईडला सुरुवात झाली.
पर्यावरणाची हानी टळेल या दृष्टीने नेट झिरो इंडिया हे मिशन हाती घेऊन नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांना निवेदन देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यता आला आहे. ही सायकल राईड नागरिकांशी संवाद साधत गेट वे ऑफ इंडिया येथून मंत्रालय – नरिमन पॉईंट- मरीन ड्राईव्ह- गिरगाव चौपाटी मार्गे मलबार हिल येथील वर्षा बंगल्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेण्यास पोहचली. ठाकरे यांनी सर्व नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशन टीमचे स्वागत व आदरातिथ्य केले. तसेच नाशिक येथून सायकलवर पर्यावरण संवर्धनासाठी चांगली मोहीम हाती घेऊन आल्याचे विशेष कौतुक केले. 2012 पासून नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनचे संस्थापक हरीष बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विविध सायकल उपक्रमांची माहिती अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी दिली.
या राईडमध्ये मुंबई येथे रहिवासी असलेले नाशिक सायकलिस्टसचे दिव्यांग सायकलिस्टस मेंबर टॅन्डम सायकलवर सहभागी झाले. त्यांच्यासह राजेंद्र वानखेडे, चंद्रकांत नाईक, रवींद्र दुसाने, डॉ. मनिषा रौंदळ, राजेश्वर सूर्यवंशी, नलिनी कड, प्रवीण कोकाटे, अविनाश लोखंडे, माधुरी गडाख, दविंदर भेला, मोहन देसाई, गणेश माळी, साधना दुसाने, वैशाली शेलार, रियाज अंसारी, निरंजन जोशी, ऋतुराज वाघ, आनंद गायधनी, किशोर काळे, मिलिंद इंगळे, ऐश्वर्या वाघ, सुरेश डोंगरे, चिन्मयी शेलार, भक्ती दुसाने हे सायकलीस्ट सहभागी झाले.