नाशिक : राज्यात पुरपरिस्थतीमुळे शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत काम करण्यासाठी मंत्री मंडळाची टिम असणे आवश्यक आहे. मात्र एकिकडे राज्याचे विरोधीपक्षनेते संकटग्रस्तांच्या भेटी घेताहेत तर मुख्यमंत्री मात्र स्वागत दौरे करत आहे हा विरोधाभास जनता बघत असून मुख्यमंत्र्यांनी यातून बोध घ्यावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदेंना लगावला.
शुक्रवारी नाशिक दौर्यावर आलेल्या पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौरा करणार असून नाशिकपासून त्यांचा दौरा सुरू होत आहे. मुख्यमंत्रयांच्या या दौर्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री दौरा करताहेत ही चांगली बाब आहे. परंतू कुठे जायचे याचा निर्णय त्यांनी घ्यावा.विरोधीपक्षनेते संकटग्रस्त शेतकर्यांच्या भेटी घेत आहेत त्यांचे दौरे स्वागतासाठी आहे असे कुठे दिसत नाही पण मुख्यमंत्री स्वागत दौरे करताहेत यातून त्यांनी बोध घ्यावा असा टोला त्यांनी लगावला. मंत्रीमंडळ विस्ताराला होत असलेल्या विलंबावर बोलतांना ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांना आपण सरकार चालवू असा आत्मविश्वास आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
मी ज्योतीषी नाही
राज्यातील सरकार कोसळेल, पुन्हा निवडणुका लागतील अशी भाकितं वर्तविण्यात येत आहेत. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, सरकार पडेल, निवडणुका लागतील हे सांगायला मी काही ज्योतीषी नाही. निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत नाही लागल्या तरी विरोधी पक्ष म्हणून आम्ही जबाबदारी पार पाडणार आहोत असं विधान पवार यांनी केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढवणार का याबाबत विचारले असता ते म्हणाले, यासंदर्भात अद्याप आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा झालेली नाही. ओबीसी आरक्षणाचा निर्णय येऊ द्या नंतर बघू, परंतू या निवडणूका महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढवाव्यात अशी आमची इच्छा आहे.
काय म्हणाले पवार …
- मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत निर्णय घेतल्यानंतर बघू
- न्यायालयाने ओबीसी आरक्षणावर दिलेला निर्णय चिंताजनक
- या निर्णयाने मोठा वर्ग सत्तेबाहेर जाण्याची भीती.
- जे प्रकल्प आघाडी सरकारने मंजूर केले त्याला विलंब करणे योग्य नाही
- आमचं संघटन खिळखिळ झालयं का हे निवडणुकीत जनता ठरवले.