आज भोंग्यांपेक्षा अनेक मोठ्या अडचणी या देशात आहेत. जातीय तेढ माजवून या देशातील बेरोजगारी जाणार आहे का? भोंगे लावून किंवा हटवून महागाई कमी होणार आहे का? असा सवाल राज्याचे गृहनिर्माण तथा अल्पसंख्यांक मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना केला आहे. आपल्या दरवाजात एखादा माणूस मदतीसाठी आला तर महाराष्ट्र धर्म पाळून त्याला मदत करा, अशा सूचनाही आव्हाड यांनी ठाण्यात रविवारी एका कार्यक्रमात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना केल्या.
भोंग्यांच्या प्रश्नावर आव्हाड म्हणाले की, “आज भोंग्यांपेक्षा अनेक मोठ्या अडचणी या देशात आहेत. जातीय तेढ माजवून या देशातील बेरोजगारी जाणार आहे का? भोंगे लावून किंवा हटवून महागाई कमी होणार आहे का? पण, आपणाला मृगजळात अडकविण्यात आलेले आहे. एकवर्षापूर्वी कोविडमुळे अनेकजण रुग्णालयात होते. अनेकांची प्रेतांवर कोणी अंत्यसंस्कार केले, नातेवाईकांनाही कळले नाही. जे रुग्णालयात राहिले; त्यांची देखभाल कोणी केली? रुग्णांना प्लाझ्मा कोणी दिला? आपण रेमडेसीवर वाटताना जात-धर्म पाहिला नव्हता. पण, आज एक वर्षानंतर कोविडमध्ये माणुसकी दाखविणारा समाज अचानक माणुसकी विसरतो आणि एकमेकांच्या जीवावर उठायला तयार होतो? कारण काय भोंगे? इतका भरकटणारा आपला समाज आहे का? आपणाला बुद्धी नाही काय? तेव्हा एकमेकांच्या मदतीला सर्वजण धावायचे. हाच जातीपातीच्या पलिकडचा महाराष्ट्र धर्म आहे.”
दरम्यान काल औरंगाबादमधील सभेत राज ठाकरेंनी भोंगा, अजानसह शरद पवार आणि एकूणचं महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कधी चैत्यभूमीवर गेला आहात का? त्यांच्या लोकांबद्दल बोलला आहात का? देवळात जाताना आम्ही कधी कॅमेरे घेऊन जात नाही असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
“यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा मंगल कलश जेव्हा आणला तेव्हा त्यांनी हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे, असे सांगितले होते. म्हणून महाराष्ट्र ज्या विचाराने पुढे गेलाय, तो विचार फक्त समोर ठेवा. कोण कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचार करु नका. आपल्या दरवाजात एखादा माणूस मदतीसाठी आला तर महाराष्ट्र धर्म पाळून त्याला मदत करा, अशा सूचनाही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केल्या.