‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशी आमची अपेक्षा होती. एवढा सगळा सुरत गुवाहाटीचा प्रवास केला. शिवाजी महाराजांनी 17 वेळा सुरत लुटली. त्याच सुरतेला तुम्ही शरणागतीसाठी गेला. स्वारी करण्यासाठी नव्हे. तुमच्या शरणागतीने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली’, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. विधानसभेचा आज पाचवा दिवस आहे. या पाचव्या दिवशी विरोधक आणि सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
“पुढे सुरतेवरुन तुम्ही गुवाहाटीला गेला. तिथे तुम्ही कामाख्या देवीच्या दर्शनाला गेला होतात म्हणे. पण तिथे अनेकांनी डोंगार, झाडी-हाटील पाहिले. हा सगळा प्रवास करुन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे आम्हाला वाटले. पण देवेंद्र फडणवीस जे सांगतात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐकतात, अशी अगोदर आमची खात्री होती. पण आता तो आमचा समज आहे” असे जयंत पाटील यांनी म्हटले.
“सुरत गुवाहाटीचा प्रवास केल्यावर तेच मुख्यमंत्री होतील, असं सगळ्यांना वाटायचं, पण त्यांना सीएम इन वेटिंग केलं डायरेक्ट. म्हणजे ज्या नेत्याला पंतप्रधान होण्याचा योग भविष्यकाळात येऊ शकतो, असं आम्ही समजत होतो. त्या नेत्याला उपमुख्यमंत्री करुन महाराष्ट्राच्या एका नेत्याचा भाजपने अपमान केला. भाजप शिवसेना सरकार सत्तेत असताना एकनाथ शिंदेंची मी एक क्लिप पाहिली. त्यात ते भाजपच्या कारभारावर चिडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात राजीनामा देतात”
“पण आज गुवाहाटीला जाऊन भाजपसोबत हातमिळवणी करुन शिंदेंनी सरकार स्थापन केले. त्याचवेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला म्हणजेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरुन खाली खेचताना त्यांना माहिती नाही पण शिवसैनिकांना प्रचंड वेदना झाल्या. तर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्या घेतल्या एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जातील, असं वाटलं होतं, पण फार दिवसांनी त्यांना बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची आठवण झाली” असे जयंत पाटील यांनी म्हटले.
“खातेवाटपात काय झाले. चंद्रकांतदादांवर किती अन्याय. उच्च आणि तंत्रशिक्षण खाते चंद्रकांतदादांना दिले. मंत्रिमंडळात एकच ध्रुवतारा आहे. तो म्हणजे गुलाबराव पाटील. त्यांचे पाणीपुरवठा खाते कुणालाही बदलता आलं नाही… सगळ्यांची खाती बदलली पण त्यांचं खातं बदललं नाही. आमचे शंभूराज देसाई किती तुमची बाजू घ्यायचे पण त्यांनाही एक्साईज डिपार्टमेंट दिले”, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.
हेही वाचा – मुंबई महापालिकेभोवती चौकशीचा फास; महालेखा परीक्षकांकडून विशेष ऑडिट करणार : देवेंद्र फडणवीस