भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज, सकाळी दिवाळी नंतर फटाके फोडणार असे ट्वीट केले होते. त्यामध्ये लिहिले होते की, ‘ठाकरे सरकारचे आणखी ३ मंत्रीचे ३ घोटाळे आणि जावयाचे ३ घोटाळे एकंदर ६ घोटाळेचा पर्दाफाश करणार’ किरीट सोमय्यांच्या या ट्वीटला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिली आहे. दिवाळीनंतर आपणच मोठा भांडाफोड करणार असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, ‘दिवाळीनंतर मीच मोठा भांडाफोड करणार आहे. असा भांडाफोड होईल की भाजप या महाराष्ट्रात तोंड दाखवण्यासाठी कुठे फिरू शकणार नाही. ते आम्हाला काय धमकी देतायत. आम्ही पोकळ धमक्यांना घाबरत नाही. मी विधानसभेत जे प्रकरण आणणार आहे, ते समोर आल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते जनतेसमोर जाऊ शकणार नाही.’
वानखेडे कुटुंबिय आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या भेटीसंदर्भात नवाब मलिक म्हणाले की, ‘तुमच्याकडे इतका मोठा पसारा आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सर्व काही आहे. नवाब मलिकांबाबत तुम्ही सात वर्ष खोदत आहात आणि अजूनही खोदत आहात. मात्र मी काही केलंच नाही. तुम्ही काय करणार आहात? असा सवाल उपस्थित केला. जर रामदास आठवले दलित व्यक्तीचा अधिकार हिरावणाऱ्या व्यक्तीच्या पाठिशी उभे राहत असतील तर हे दुर्दैव आहे.’
हेही वाचा – ‘वानखेडे जन्मापासून मुस्लिमच, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांनी दिलेली क्लीनचीट संशयास्पद’